मुंबईत लोकलच्या सिग्नल यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडामुळे सकाळी सकाळी कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांचे, विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचं पाहायला मिळाले. ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं एक्सवर (ट्विटर) दिली . या बिघाडामुळे कल्याण ते कुर्ला यादरम्याच्या लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला. कल्याणहून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या तब्बल २० मिनिटं उशीरानं धावत होत्या. काही स्थानकांवर रेल्वे खोळंबल्या. हा बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार सकाळी १०.१५ वाजता बिघाड दुरुस्त झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईच्या दिशेनं निघाले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी नेहमीच्या वेळेची लोकल ट्रेनही पकडली. पण ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या ट्रॅकवर थांबून राहिल्या. या भागात अडकलेल्या लोकलमुळे त्यामागे आणि पुढे असणाऱ्या लोकलही खोळंबल्या. परिणामी मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, कामासाठी किंवा इतर पूर्वनियोजित गोष्टींसाठी उशीर होत असल्यामुळे अनेक मुंबईकरांनी जागेवरच खोळंबलेल्या लोकल ट्रेनमधून उतरून चालतच रस्ता गाठण्याचा मार्ग स्वीकारला. ठाणे स्थानकाजवळ थांबलेल्या एसी लोकलचे दरवाजे उघडल्यानंतर तिथूनही अनेकांनी खाली उतरण्याचा मार्ग पत्करला.