मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली येथे शनिवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे लोकल सेवा २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होती. ऐन गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने धीम्या, जलद, वातानुकूलित लोकल कूर्मगतीने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब झाला.

कांदिवली येथे शनिवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर, पश्चिम रेल्वेवरील बोरिवली – गोरेगाव स्थानकांदरम्यान लोकल विलंबाने धावत होत्या. तसेच अनेक लोकल दोन स्थानकांच्या दरम्यान एका मागे एक उभ्या होत्या. लोकल खोळंबल्यामागचे नेमके कारण प्रवाशांना समजत नव्हते. त्यामुळे लोकलमधील प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी रेल्वे मार्गावर उतरून नजिकचे स्थानक गाठले आणि रस्ते मार्गे कार्यालय गाठले. कार्यालयीन वेळेत झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

हेही वाचा : बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्यात भाजप मंत्र्यावर आरोप; पोलीस उपायुक्ताच्या याचिकेनंतर खळबळ पोलीस महासंचालकांकडेही बोट

सिग्नल यंत्रणेतील बिघाडाची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सकाळी ८.४० वाजता सिग्नल यंत्रणा दुरूस्त करण्यात आली. मात्र, त्यायानंतरही अनेक लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे नोकरदारांना कार्यालयात, विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यास विलंब झाला. त्यानंतर सकाळी १० नंतर जलद मार्गावरील लोकल १० ते २० मिनिटे, तर धीम्या लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवासी हैराण झाले.