मुंबई : सागरी किनाऱ्यावरील कांदळवनांची विकासकामांमुळे झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आला आहे. सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या भागातील कांदळवने बाधित होणार आहेत. त्याची नुकसानभरपाई म्हणून चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कांदळवने नष्ट झाल्यामुळे किनारपट्टी भागांची हानी चंद्रपूरमध्ये झाडे लावून भरून कशी निघणार असा प्रश्न आहे. सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा – भाईंदर दरम्यानच्या विस्तारासाठी वर्सोवा ते भाईंदर भागातील कांदळवनांचे स्थलांतर करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्याच वेळी भरपाई म्हणून वनीकरण करण्याची अटही घालण्यात आली आहे. भौगोलिक क्षेत्रानुसार आणि हवामानानुसार वनांची रचना, वनस्पती वेगवेगळ्या असतात. ही वनसंपदा निसर्गात जैवविविधतेच्या दृष्टीने निरनिराळ्या भूमिका बजावतात.
कांदळवनाचा विनाश पर्यावरणावर आणि मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवर परिणाम करतो. त्याची भरपाई कांदळवने नसलेल्या ठिकाणी करून काय साधणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत झटपट पोहोचता यावे यासाठी सागरी किनारा रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील श्यामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी- वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) बांधण्यात आला आहे.
नवी मुंबई सागरी रस्त्यामुळे होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसानभरपाईसाठी जळगावमधील एका गावात केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने परवानगी दिली होती. तसेच मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या बोरिवली- विरार दरम्यान रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजुरी दिली होती. या प्रकल्पामुळे तेथील कांदळवने बाधित होणार असल्याने त्यांची नुकसानभरपाई म्हणून गडचिरोलीत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भाईंदरमध्येही नुकसानभरपाई
या प्रकल्पामुळे होणाऱ्या कांदळवनाची नुकसानभरपाई भाईंदरमध्येही करण्यात येणार आहे. भाईंदरमधील ३० हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कांदळवनांचे महत्त्व
कांदळवने ही किनाऱ्यांसाठी वरदान आहेत. कांदळवनांमध्ये झाडे, झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती आणि जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींचा समावेश असतो. त्यांच्या मुळांचा जमिनीवर असलेला भाग गुंतागुंतीसारखा वाटत असला तरी ही मुळे एकप्रकारे भरतीच्या पाण्याचा वेग रोखणाऱ्या बफरसारखे काम करतात. हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठीही कांदळवनातले वृक्ष आणि दलदल हे कार्बन सिंकसारखे काम करतात. म्हणजे ती मोठ्या कार्बन शोषून घेतात. अनेक जलचरांचे ते आश्रय स्थान आहे. कांदळवने ही उपजीविकेचे साधन म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे कांदळवन हे सागरी किनाऱ्यांसाठी लाभलेले वरदान आहे.
कांदळवनाची नुकसानभरपाई करण्याचा अर्थ कांदळवन नष्ट करणे असाच निघतो आणि इतक्या दूरवर वृक्षारोपण करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. यामुळे मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवरही परिणाम होतो. – बी.एन. कुमार, पर्यावरणप्रेमी, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन
एक रस्ता बांधण्यासाठी मुंबईतील नैसर्गिक संपत्ती नष्ट केली जाते. मुंबईकर आधीच बिघडलेल्या वातावरणाला तोंड देत आहेत. असे असताना दरवेळी विकासकामांसाठी वृक्षतोड करणे हे योग्य नाही. मुंबईतील हे क्षेत्र नष्ट केल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. – झोरू बथेना, पर्यावरण अभ्यासक
।