मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे मोठा गाजावाजा शनिवारी करीत लोकार्पण करण्यात आले आणि मुंबईकरांसाठी आरे – बीकेसी भुयारी मेट्रो प्रवास सोमवारपासून खुला करण्यात आला. मात्र दोन दिवसांतच या टप्प्यातील मेट्रो सेवा विस्कळीत झाली असून बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सहार स्थानकावर मेट्रो तब्बल अर्धातास खोळंबली होती. त्यामुळे झटपट कार्यालयात पोहोचण्यासाठी मेट्रोची निवड करणाऱ्या प्रवाशांना विलंब यातना सोसाव्या लागल्या.

‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांनी भुयारी मेट्रोतून प्रवासही केला. ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर अनेकांनी पाठ थोपटून घेतली. झटपट प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध झाल्याने मुंबईकरही खूष झाले. सर्वसामान्य नागरिकांसाठी आरे – बीकेसी टप्पा सोमवारी खुला करण्यात आला. त्यामुळे भुयारी मेट्रोतून प्रवास करण्यासाठी अनेक मुंबईकरांनी आरे – बीकेसी दरम्यानच्या स्थानकांवर गर्दी केली होती. मात्र दोन दिवसातच मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आरे- बीकेसी दरम्यान मंगळवारी मेट्रो विलंबाने धावत होती. बीकेसी स्थानकावर अर्ध्या तासानंतर मेट्रो पोहोचली. तोपर्यंत स्थानकावर प्रवाशा गर्दी झाली होती. मेट्रो सेवा सुरळीत कधी होईल याबाबत माहिती मिळत नसल्याने प्रवासी हैराण झाले होते. ऐन कार्यालयीन वेळेत मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रवाशांना बुधवारीही असाच अनुभव आला. सहार स्थानकात बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास मेट्रो तब्बल अर्धातास खोळंबली होती. मेट्रो सेवा नेमकी कशामुळे विस्कळीत झाली हे प्रवाशांना समजत नव्हते. एकीकडे मेट्रो विलंबाने धावत होती, तर दुसरीकडे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत होती. यामुळे प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला.

हे ही वाचा… रहिवाशांना ६३५ चौरस फुटांचे घर; अभ्युदयनगर वसाहत पुनर्विकास; बांधकामासाठी आज निविदा

हे ही वाचा… Dharavi Assembly constituency : धारावीचा उमेदवार कोण? उद्धव ठाकरे काँग्रेसकडून मतदारसंघ मागणार?

आरे – बीकेसी दरम्यान पहिली गाडी सकाळी ६.३० वाजता, तर शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटेल. दर साहेसहा मिनिटांनी मेट्रो धावेल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांतच मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.