मुंबई : मुंबईत रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती असून, किमान तापमानाचा पारा शनिवारी २१.४ अंश सेल्सिअसवर होता. ऑक्टोबर महिन्यात मागील दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी प्रथमच किमान तापमानात ३ अंश सेल्सिअसने घट झाली. मात्र, कमाल तापमानाचा पारा ३० अंशापेक्षा अधिक असल्याने दिवसा उकाडा कायम आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. किमान तापमानात घसरण झाली असली तरी सध्या कमाल तापमानाचा पारा चढाच आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शनिवारी २१.४ अंश सेल्सिअस किमान, तर ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रात किमान २५.५ अंश, तर कमाल ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रांवरील किमान तापमान शुक्रवारपेक्षा ३ अंशाने कमी होते. दरम्यान, सध्या उत्तरेकडून वारे येत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. दोन दिवसांनी पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – मुंबई महापालिकेचे माजी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी

हेही वाचा – मुंबई : गोवंडीतील नाल्यात सापडला दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह

दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता आहे.