मुंबई : मुंबई महानगरात सर्रास रेल्वे रूळ ओलांडतात धावत्या रेल्वेची धडक लागून प्रवाशाचा जीव जातो. तसेच काही प्रवाशांना कायमचे अपंगत्व येते. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधण्यावर भर दिला आहे. नुकताच हार्बर मार्गावरील गोवंडी – मानखुर्द आणि वडाळा – किंग्ज सर्कलदरम्यान बांधलेले नवीन पादचारी पूल नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) ‘मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३’ (एमयूटीपी – ३) अंतर्गत हार्बर मार्गावरील गोवंडी – मानखुर्द दरम्यान पादचारी पुलाचे बांधकाम एप्रिल २०२४ मध्ये हाती घेण्यात आले. तर, वडाळा – किंग्ज सर्कल पादचारी पुलाचे बांधकाम जानेवारी २०२४ रोजी सुरू करण्यात आले. हे दोन्ही पादचारी पूल २२ ऑगस्ट रोजी कार्यान्वित करण्यात आले आहेत.

हेही वाचा…‘ड्रीम ११’चा डेटा ‘डार्कनेट’वर टाकण्याची धमकी देणारा ई-मेल, कर्नाटकातून एकाला अटक

गोवंडी – मानखुर्ददरम्यान पादचारी पुलाचे वैशिष्ट्ये

लांबी – २३.६० मीटर

रूंदी – ४ मीटर
१३३ दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले

वडाळा – किंग्ज सर्कलदरम्यान पादचारी पुलाचे वैशिष्ट्ये

लांबी – ७७.५९ मीटर
रुंदी – ४ मीटर

२१६ दिवसांत काम पूर्ण करण्यात आले

वडाळा – किंग्ज सर्कलदरम्यान उभारण्यात आलेल्या पादचारी पुलामुळे रावली परिसरातील रहिवाशांचे; तर गोवंडी – मानखुर्ददरम्यान पादचारी पूल उभारल्याने आगरवाडी येथील रहिवाशांचे अनधिकृतपणे रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखणे शक्य होणार आहे. तसेच भविष्यात आणखी पादचारी पुलांची उभारणी करण्याच्या कामाला वेग देण्यात येत आहे. -सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, एमआरव्हीसी

हेही वाचा…मुंबई : लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतील अटी वादात, जाचक अटी रद्द करण्याची मागणी

एमयूटीपी-३ अंतर्गत २८ पादचारी पूल प्रस्तावित होते. यापैकी २३ पादचारी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दोन पादचारी पुलाचे विस्तारीकरण, दोन लिंक-वे, एक भुयारी मार्ग, बदलापूर येथील ‘होम प्लॅटफॉर्म’ उभे करण्यात आले आहेत. तर, डिसेंबर २०२४ पर्यंत पश्चिम रेल्वेवरील विरार येथील पादचारी पुलाचे बांधकाम पूर्ण होईल. तर, फेब्रुवारी २०२५ पर्यंत बदलापूर, मार्च २०२५ पर्यंत बदलापूर – वांगणी, अंबरनाथ, कळवा येथे पादचारी पूल उभारण्यात येतील.