Latest News in Mumbai Today Live : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खळबळजनक आरोप केला आहे. आरोपी महिला व तिच्यासोबतचे सहकारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे आज दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली. अशा घडामोडी तसंच मुंबईतील वाहतुकीचे अपडेट्स, गुन्हे आणि न्यायालयीन घडामोडींची माहिती, महानगरपालिका तसंच वाहतुकीचे अपडेट्स आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या या live blog च्या माध्यमातून जाणून घेता येतील…
Mumbai Maharashtra News LIVE Today, 25 march 2025
जोगेश्वरीतील पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास लवकरच मार्गी
मुंबई : जोगेश्वरी, मजास येथील पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सीऐवजी (सी अँड डी) स्वतः करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार मंडळाने आता या पुनर्विकासाचा आराखडा पूर्ण केला असून लवकरच पुनर्विकासासंबंधीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
विधि अभ्यासक्रमासाठी अर्धवट अर्ज भरलेल्या ३६ हजार विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई : विधि तीन वर्षे आणि विधि पाच वर्ष अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सुमारे ३६ हजार विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरल्याचे निदर्शनास आले असून त्यांना सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) देता येणार नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीईटी कक्षाने (राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष) ३६ हजार विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
समृद्धी महामार्गाच्या महसुलात वाढ; आतापर्यंत १ कोटी ८५ लाखांहून अधिक वाहनांचा प्रवास
Disha Salian Case : “आदित्य ठाकरेंचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग, तर उद्धव ठाकरेही दिशा सालियन प्रकरणात आरोपी”, वकील निलेश ओझांचा गंभीर आरोप
Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका काही दिवसांपूर्वी दाखल केल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. दिशा सालियनची आत्महत्या नाही तर हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे.
पवईत शास्त्रज्ञ महिलेवर पाळीव कुत्र्यांचा हल्ला; कुत्र्यांच्या मालकासह तिघांविरोधात गुन्हा
मुंबई : पवई येथे राहणाऱ्या शास्त्रज्ञ महिलेवर दोन पाळीव कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यांत गंभीर जखमी झालेल्या महिलेला नाकाच्या पुनर्रचनेसाठी शस्त्रक्रिया करावी लागली. पवई पोलिसांनी रविवारी कुत्र्याच्या मालकासह त्यांची देखभाल करणारे आणि घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात निष्काळजीपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. घटना घडली त्यावेळी कुत्र्यांचा मालक परदेशात होता.
लाभार्थी, नागरिकांना तक्रार-समस्यांचे निराकरण करण्याची संधी
मुंबई : म्हाडा उपाध्यक्षांच्या निर्देशानुसार म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने लाभार्थी, नागरिकांच्या तक्रारी – समस्यांचे निवारण करण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिला जनता दरबार २८ मार्चला आयोजित करण्यात आला आहे.
१४२ कोटींचे टोरेस गैरव्यवहार प्रकरण : हवाला चालकाने गुंतवणूकदारांच्या पैशांतून केली सदनिकांची नोंदणी
मुंबई : टोरेस गैरव्यवहारात अटक करण्यात आलेला हवाला ऑपरेटर अल्पेश प्रवीणचंद खाराने टोरेस गैरव्यवहारातील गुंतवणूकदारांच्या रकमेतून दक्षिण मुंबईत तीन सदनिका खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम भरल्याचे निष्पन्न झाले आहे.
आंबोलीत कोळ्याची नवी प्रजाती सापडली
मुंबई : काही वन्यजीव संशोधकांनी आंबोलीमधील जैवविविधतेचा प्रत्यय देणारे संशोधन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावात कोळ्याची नवीन प्रजाती शोधण्यात यश आले असून ‘ इंडोथेल आंबोली’ असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे.
नऊ जणांनी केलेल्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू
मुंबई : पूर्वीच्या वादातून २५ वर्षीय तरूणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी सहा जणांना अटक केली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
कंत्राटदाराला नालेसफाईच्या कामाचे छायाचित्रांसह ३० सेकंदांचे चित्रीकरण बंधनकारक
मुंबई : महानगरपालिकेतर्फे छोट्या व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी मागवलेल्या निविदांची छाननी पूर्ण झाली असून एकूण २३ कंत्राटदारांना नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. येत्या मंगळवारपासून गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
नासाडीकडे दुर्लक्ष, राखीव साठ्यावर डोळा
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेले रस्ते काँक्रीटीकरण, मेट्रो प्रकल्प, पर्जन्यवाहिन्यांची पुनर्बांधणी, विविध ठिकाणी सुरू असलेले रस्ते, पुलांची काम आदी विकासकामांचा थेट फटका मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना बसू लागला आहे.
चारकोल प्रदूषणकारक की पर्यावरणस्नेही? निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे एमपीसीबीला आदेश
मुंबई : शहरातील काही हॉटेल्स आणि बेकऱ्यांमधील भट्टीमध्ये वापरण्यात येणारा चारकोल हा प्रदूषणकारी आहे की नाही याचा निर्णय तज्ज्ञ प्राधिकरण म्हणून तुम्हीच घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) दिले.
२००८ सालचा मालेगाव बॉम्बस्फोट खटला, विशेष न्यायालयाच्या न्यायधीशांच्या नियोजित बदलीला मुदतवाढ द्या, पीडितांची उच्च न्यायालयाकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी
मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए के लाहोटी यांच्या नियोजित बदलीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी प्रकरणातील पीडितांनी उच्च न्यायालयाला पत्रव्यवहार केला आहे.
सीपीएसच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय कायम, उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घालून दिलेल्या किमान निकषांची पूर्तता होत नसल्याने कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स (सीपीएस) या संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मान्यता रद्द करण्याचा १४ जुलै २०२३ रोजीचा निर्णय आणि त्यानुषंगाने काढलेली अधिसूचना उच्च न्यायालयाने सोमवारी योग्य ठरवली.
महिलेने दान केलेल्या लहान आतड्यांमुळे पतीचे प्राण वाचले
मुंबई : नाशिकमधील महिलेने मरणाच्या दारात असलेल्या पतीला लहान आतडे दान करून त्याला नवजीवन दिले. जयश्री यांनी केलेल्या अवयव दानामुळे दुर्मीळ आणि गुंतागुंतीचे लहान आतड्यांचे प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश आले.
मुंबईकरांनो… आज करावा लागणार उष्णता आणि उन्हाचा सामना
मुंबई : कडाक्याच्या उन्हाळ्यास सुरुवात झाली असून तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मागील काही दिवस तापमानाच्या पाऱ्यात घट झाल्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून मुंबईकरांची सुटका झाली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेस्टच्या दुर्देशेबाबत चर्चाही नाही, कामगार सेनेची नाराजी
मुंबई : मुंबईची जीवनवहिनी असलेला बेस्ट उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर असून बेस्टच्या दुर्दशेबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकदाही चर्चा झाली नाही. त्याबद्दल बेस्टमधील कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कामगार सेनेने सर्व आमदार व मंत्र्यांना बेस्टच्या दुरावस्थेबद्दल पत्र पाठवले होते. मात्र बेस्टचा विषय एकदाही चर्चेला आला नाही.
महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात ५४० उमेदवारांना मिळाली नोकरी, पात्र उमेदवारांच्या हातात थेट ऑफर लेटर
मुंबई : महानगरपालिकेने कांदिवलीमधील (पूर्व) आकुर्ली येथे उभारलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात सोमवारी विद्यार्थ्यांच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात १ हजार ४९० उमेदवार नोकरीच्या शोधात आले होते. त्यापैकी पात्र ठरलेल्या ५४० उमेदवारांना नोकरी मिळाली.
प्रभादेवी पूल एप्रिलआरंभी बंद, आगामी वर्षभरासाठी वाहतुकीत बदल; पाडकामासाठी ‘एमएमआरडीए’ची तयारी सुरू
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) शिवडी-वरळी उन्नत मार्गांतर्गत १२५ वर्षे जुना प्रभादेवी उड्डाणपूल पाडून त्याजागी नवा द्विस्तरीय उड्डाणपुल बांधण्यात येईल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला जाईल. त्यानंतर पुलाचे पाडकाम सुरू होईल. पाडकामासाठी १० एप्रिलपूर्वी मुंबई वाहतूक पोलीस अंतिम परवानगी देतील. दरम्यान हा मार्ग पुढील वर्षभरासाठी बंद राहील.
आयआयटी मुंबईत नवे पदविका अभ्यासक्रम
मुंबई : सॉफ्टवेअर विकासक, डेटा वैज्ञानिक, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि अभियंते यांना यांना संगणक प्रोग्रामिंग, संगणन प्रणाली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांसारख्या अत्याधुनिक विषयांचे अधिक सखोल ज्ञान मिळावे यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (आयआयटी मुंबई) ‘ई-पदव्युत्तर डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग’ हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स