Latest News in Mumbai Today Live : मुंबई हे भारताचे आर्थिक आणि विविध संस्कृतींचे एक ठिकाण आहे जिथे संपूर्ण भारत आणि जगभरातून लोक येतात . तेव्हा राजकीय घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे क्षेत्रातील बातम्या, आर्थिक घडामोडी, नागरी समस्या याबाबतच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
Mumbai Maharashtra News LIVE Today, 13 March 2025
जुहू, डी एन नगरातील इमारतींच्या उंचीवरील मर्यादा उठविण्याबाबत संदिग्धता! चारशे जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडलेलाच!
मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील दादाभाई नौरोजी नगर (डी. एन. नगर) आणि जुहू - गुलमोहर मार्ग परिसरातील इमारतीच्या उंचीवरील निर्बंध उठण्यासाठी आता पुढील पावसाळी अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या परिसरातील सुमारे चारशे जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरु होण्यास विलंब लागणार आहे.
तानसा अभयारण्यात युरेशियन ससाण्याची नोंद; अभयारण्यात पहिलीच नोंद
मुंबई : युरेशियामध्ये आढळणाऱ्या 'युरेशियन ससाण्या'चे (युरेशियन गोशॉक) ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्यात दर्शन घडले. दरम्यान, अभयारण्यातील ही पहिलीच नोंद असून गस्तीवर असलेल्या वनपालांना युरेशियन ससाण्याचे दर्शन घडले.युरेशियन ससाणा ही ॲसिपिट्रिडे कुटुंबातील मध्यम - मोठ्या शिकारी पक्ष्यांची एक प्रजाती आहे.
उकाड्याचा ‘ताप’ कायम, मुंबईकरांना दिलासा नाही
मुंबई : मुंबईचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. वाढलेले तापमान आणि दमट वातावरणामुळे उन्हाचा असह्य त्रास मुंबईकरांना होत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत उष्ण व दमट वातावरण असेच राहणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तापमानात वाढ होणार नसली, तरी दिवसभर मुंबईकरांना उकाडा सहन करण्यावाचून पर्याय नाही.
नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीत होत असलेल्या मांस विक्रीची हवाई सुरक्षा शाखेकडून चौकशी
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून फक्त ३ किमी अंतरावरील उलवे परिसरात मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याच्या पर्यावरण प्रेमींनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) हवाई सुरक्षा शाखेने चौकशी सुरू केली आहे.
‘टिस’च्या विद्यार्थ्याचे निलंबन कायम, संस्थेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई : कथित गैरवर्तन आणि देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपांप्रकरणी पीएचडी करणारा दलित विद्यार्थी रामदास के. एस. याला निलंबित करण्याच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (टिस) निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.
विकसित भारतनिर्मितीसाठी प्रक्रियात्मक सुधारणाही आवश्यक, अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांचे प्रतिपादन
मुंबई : संरचनात्मक सुधारणांकडे माध्यमांचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष नेहमीच असते. पण विकसित भारतासाठी प्रक्रियात्मक सुधारणाही (प्रोसेस रिफॉर्म्स) अत्यंत महत्त्वाच्या असतात. या सुधारणांतून त्वरित यश मिळत नसले, तरी दीर्घकालीन वाटचालीसाठी त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते, असे ठाम मत अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
शास्त्रीय मूल्यमापनामुळे चांगल्या कामासाठी स्पर्धा
मुंबई : ‘जिल्हा निर्देशांका’सारख्या शास्त्रीय मूल्यमापनामुळे चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काढले. राज्यात केवळ विकासाची बेटे तयार न करता समतोल विकास साधण्याचा आपला प्रयत्न असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
अक्षय शिंदे चकमकीचा अपघाती मृत्यू म्हणूनच तपास करणार का? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा
मुंबई : बदलापूर येथील बालवाडीतील दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीचा अपघाती मृत्यू म्हणूनच तपास करणार का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली.या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीआयडी) स्वतंत्र चौकशी सुरू आहे.
फास्टॅग सक्तीचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम, सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार
मुंबई : प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणे तसेच रोख देयकांसाठी (पेमेंट) दुप्पट शुल्क आकारण्याच्या राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण आम्हाला आढळून नाही, असे निरीक्षण नोंदवून फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स