मुंबई : मुंबई विमानतळावर निळ्या रंगाच्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचे टर्मिनल २ येथे दूरध्वनी करून एका व्यक्तीने सांगितले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आसपासची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तपासणीत सुरक्षा कर्मचार्‍यांना विमानतळ परिसरात काही संशयास्पद आढळले नाही. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीबाबत पोलीस अधिक माहिती मिळवत आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी ६ वाजता टी २ येथील अधिकाऱ्यांना एका निनावी दूरध्वनी आला.

दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावर एक निळी बॅग ठेवण्यात आली असून त्यात बॉम्ब असल्याचे सांगितले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आणि विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थापकांना दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ सर्व यंत्रणांना याबाबतची माहिती देऊन विमानतळ परिसरात शोध मोहीम राबविली. पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : “मोदींनी स्वतःच्या पैशाने जनधन खाती उघडली का?”, अंबादास दानवेंचा प्रश्न, म्हणाले, “हा पैसा…”

स्थानिक सहार पोलिसांनाही माहिती देण्यात आली. तसेच दहशतवाद विरोधी सेलच्या अधिकाऱ्यांनीही विमानतळाला भेट दिली. स्थानिक पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा : ‘लोकशाही’चा गळा घोटण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; विरोधी नेत्यांची टीका

गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील गस्तीसोबतच सीसी टीव्ही कॅमेरे, वॉच टॉवरच्या सहाय्याने करडी नजर ठेवली आहे. त्यातच या दूरध्वनीमुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडला आहे. शहरात १५ उपायुक्त, दोन हजार पोलीस अधिकारी व ११ हजार कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही संवेदशील ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात येत आहे

Story img Loader