Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस ( Mumbai Rain ) पडतो आहे, त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरच्या लोकलसेवा ठप्प झाल्या आहेत. मुंबईतल्या या पावसाने ( Mumbai Rain ) घरी परणाऱ्या प्रवाशांचे तुफान हाल झाले आहेत. तसंच मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर प्रवाशांची गर्दीही होते आहे. अनेक लोक जे संध्याकाळी निघाले होते ते ट्रेन्समध्ये अडकून पडल्याच्याही घटना घडल्या. यानंतर आता मध्य रेल्वेने प्रवाशांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

हे पण वाचा-Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, लोकलसेवा कोलमडली, प्रवाशांचे बेक्कार हाल

काय आहे मध्य रेल्वेचं आवाहन?

प्रवाशांनो तुमची सुरक्षा महत्त्वाची आहे. जर तुम्ही ट्रेनमध्ये अडकला असाल तर कृपा करुन बाहेर पडू नका. ट्रॅकवर उतरून चालण्यास सुरुवात करु नका. कारण मुसळधार पावसामुळे प्रचंड अनेक ठिकाणी पाणी साठलं आहे. लोकल वाहतूक संथ गतीने सुरु आहे. आमचं सगळ्या प्रवाशांना आवाहन आहे की जर तुम्ही ट्रेनमध्ये असाल तर डब्याच्या बाहेर पडून रुळांवर उतरू नका. जेव्हा पाणी ओसरेल तेव्हा ट्रेन पुढे जाईल. तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी पोहचू शकाल. तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. यातून तुमची सुरक्षाच होणार आहे त्यामुळे आम्ही हे आवाहन करत आहोत. अशी पोस्ट मध्य रेल्वेने एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर केली आहे.

लोकल सेवा २० ते ४० मिनिटं उशिराने

मुसळधार पावसामुळे ( Mumbai Rain ) मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा २० ते ३० मिनिटांनी विस्कळीत झाली आहे. तर, पश्चिम मार्गावर जलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने असून स्लो मार्गावरील लोकल ५ ते ६ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. तर, कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुंड येथील रस्त्यांवर पाणी साचल्याने नद्यांचं स्वरुप आलं आहे.अनेक लोकल्स ट्रॅकवर पाणी साठल्याने ( Mumbai Rain ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली. रात्री उशिरा म्हणजे साधारण ११.१५ च्या नंतर लोकल हळूहळू सुरु झाल्या. तरीही मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिरानेच सुरु आहे.

mumbai heavy rain local down
मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत ( फोटो – लोकसत्ता प्रतिनिधी)

बुधवारी संध्याकाळपासून वाढला पावसाचा जोर

गेल्या काही दिवसांपासून पावसाने ( Mumbai Rain ) विश्रांती घेतली होती. गणेशोत्सव काळातही तुरळक पाऊस झाला. मात्र आज अचानक पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागल्या. तर, संध्याकाळनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कार्यालयीन कामं संपवून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वे आणि पश्चिम मार्गावरही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी पाहायला मिळते. तर काहीजणांनी कार्यालयातच थांबण्याचा निर्णय घेतला. तर लोकल सेवा विस्कळीत झाल्याने लोकांचे हाल होत आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली या उपनगरांमध्येही पावसाची जोरदार हजेरी आहे.