Mumbai Maharashtra Rain Alert Update : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता बरसायला सुरुवात केली आहे. विदर्भ, मराठावाडा आणि कोकणात धुमाकूळ घातल्यानंतर आता मुंबईत तुफान पाऊस सुरू झाला आहे. परिणामी कार्यालयीन कामे संपून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल झाले आहेत.

मध्ये मार्गावरील रेल्वे सेवा २० ते २५ मिनिटांनी विस्कळीत झाली आहे. तर, पश्चिम मार्गावर जलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने असून स्लो मार्गावरील लोकल ५ ते ६ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. तर, कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुडं येथील रस्त्यांवर पाणी साचल्याने नद्यांचं रुप आलं आहे.

हेही वाचा >> Mumbai Rain Red Alert: परतीच्या पावसाचा हाहाकार! मुंबईत उद्या सकाळी ८.३० पर्यंत रेड अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. गणेशोत्सव काळातही पाऊस झाला नाही. परंतु, आज अचानक पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागल्या. तर, सायंकाळनंतर या रिमझिम सरींनी मुसळधार पावसाला सुरुवात केली. त्यामुळे कार्यालयीन कामे आटोपून घरी परतणाऱ्या नोकरदारवर्गाचे चांगलेच हाल झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर, मध्य रेल्वे आणि पश्चिम मार्गावरही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी पाहायला मिळते. तर काहीजणांनी कार्यालयातच आसरा घेतला आहे. राज्यात सोमवारपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.

हवामान विभागाने दुपारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि रायगडसाठी रेड अलर्ट दिला होता. मात्र आता मुंबईतील पावसाची परिस्थिती पाहून उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

तापमानात होणार घट

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र व लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि मुंबईत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मागील दोन दिवस कमाल तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, आता पुढील आठवड्यात अपेक्षित पावसानंतर तापमानात काही अंशी घसरण होण्याची आणि उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.