जुलैच्या सुरुवातीच्या १५-२० दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून तलावांच्या पाणलोटक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पाणीसाठा ८८ टक्क्यावरच आहे. त्यात वाढ झालेली नाही. तलावांच्या पाणलोटक्षेत्रात दिवसाकाठी साधारण ५० मि.मी.पेक्षाही कमी पाऊस पडत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात तलावांत सध्या ८८.२८ टक्के पाणीसाठा आहे. सातही धरणात मिळून सध्या १२ लाख ८७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे तलावांतील पाणीसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे. पाणीसाठा सध्या स्थिरावला असून दोन वर्षांच्या तुलनेत तो अधिक आहे. मात्र आजघडीला तलावांतील पाणीसाठ्यात सुमारे १२ टक्के तूट आहे. पाऊस लांबल्यास ही तूट वाढू शकते. मोडक सागर आणि तानसा व तुळशी हे तलाव पूर्ण भरले आहेत. मात्र आता पाऊस विश्रांती घेतली आहे.
तीन वर्षांचा २७ जुलैपर्यंतचा जलसाठा
वर्ष — ( दशलक्ष लिटर मध्ये) …..टक्केवारी
२०२२ – १२,७७,७८७ …… ८८.२८ टक्के
२०२१ – ९.८७,३२५ …. ६८.२२ टक्के
२०२० – ४,६०,३४५ ….. ३१.८१ टक्के
धरणात पडलेला पाऊस
उर्ध्व वैतरणा ……५.० मि.मी.
मोडक सागर …. ४.० मि.मी.
तानसा ………. ०.० मि.मी.
मध्य वैतरणा …… १७.०० मि.मी.
भातसा ….. २०.०० मि.मी.
विहार ……. १९.०० मि.मी.
तुलसी …….. २४.०० मि.मी.