मुंबई : शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून शहरातील सकल भागात पाणी साचलं आहे. रेल्वे व रस्ते वाहतुकीला या पावसाचा फटका बसला आहे. शहरांतील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतूक खोळंबली आहे. कित्येक रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला रेल्वे वाहतूक धिम्या गतीने चालू आहे. यामुळे मुंबईकरांना आपलं कार्यालय अथवा कामाचं ठिकाण गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकजण बस आणि लोकलमध्ये अडकले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह अनेक आमदार आज सकाळी विधीमंडळात पोहोचू शकले नाहीत. त्यांनाही विधीमंडळ गाठण्यासाठी पायपीट करावी लागली. दरम्यान, अवघ्या सहा तासांच्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर टीका होऊ लागली आहे. पालिका प्रशासनाने त्यांचं काम चोख न केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याची टीका विरोधक आणि नागरिकांकडून होत असतानाच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पालिका प्रशासनाचा बचाव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुधीर मुनगंटीवार यांनी पालिकेचा बचाव केल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही अशा स्थितीतही पालिका प्रशासनाला क्लीन चिट देत आहात का? यावर मुनगंटीवार म्हणाले, “मी महापालिकेला क्लीन चीट देण्याचा इथे विषय नाही. परंतु. असे प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकालीन व्यवस्था कराव्या लागतात. मुंबईसाठी १७ हजार कोटी रुपयांच्या योजना आणल्या आहेत. त्यातून आपण मुंबईला सर्व प्रश्नांमधून मुक्त करू. मुंबईतील ९० टक्क्यांहून अधिक अडचणी यातून सोडवल्या जातील. परंतु, जेव्हा पाऊस अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात बरसतो तेव्हा असे प्रश्न निर्माण होतातच.”

हे ही वाचा >> “…म्हणून मुंबईतील पावसात मंत्री, आमदार अडकले”, वडेट्टीवारांचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांना चिमटा

मुंबईसमोरचे प्रश्न लवकर सुटती; मुनगंटीवारांना विश्वास

मुनगंटीवार म्हणाले, “पाऊस थोडा असेल किंवा रिमझिम बरसत असेल तर असे प्रश्न निर्माण होत नाहीत. सतत मुसळधार पाऊस पडतो तेव्हा अशी अडचण निर्माण होते. म्हणून मी मुंबई महापालिकेला दोष देत नाही. मुंबई महापालिकेला दोष द्यायचा असेल तर इतर ठिकाणीही पाणी साचतंय, त्यावरही बोलायला हवं. दुबईतील प्रशासन, न्यूयॉर्कमधील प्रशासन चांगलं काम करतं तरी देखील तिकडे पाणी साचतं. चीनमध्ये चार दिवसांपूर्वी आठ फूट पाणी साचलं होतं. त्यामुळे या गोष्टींना दोष देण्याऐवजी काही सकारात्मक गोष्टी करायला हव्यात. आपण आपल्या शहरात आवश्यक त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. १७,००० कोटी रुपयांच्या योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील प्रश्न लवकर सुटतील.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rains city almost flooded due to heavy rainfall sudhir mungantiwar defended bmc asc
Show comments