मुंबई : पूर्वमूक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास करण्यात येणार असून विस्तारीकरणात थेट विस्थापित होणाऱ्या रमाबाई नगरातील १६९४ रहिवाशांची पात्रता निश्चिती अंतिम करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गुरुवारी ‘परिशिष्ट २’ प्रसिद्ध केले. यानुसार १६९४ पैकी ६५ टक्के म्हणजे १०२९ रहिवासी पात्र ठरले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचा छेडानगर ते आनंदनगर, ठाणे असा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारीकरणात रमाबाई नगरातील १६९४ झोपड्या बाधित होत आहेत. असे असताना केवळ या झोपड्यांचेच नव्हे तर संपूर्ण रमाबाई नगरातील १६ हजार ५७५ झोपड्यांच्या पुनर्विकासाची जबाबादारी एमएमआरडीएने घेतली आहे. एमएमआरडीए आणि झोपु प्राधिकरण संयुक्त भागिदारी तत्वावर हा पुनर्विकास करणार आहे. त्यानुसार झोपुने रमाबाई नगरातील १६ हजार ५७५ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. पात्र रहिवाशांबरोबर करारनामा करण्याचे काम आता एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे.

होहा वाचा – मुंबई : दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, आता २४ अतिरिक्त फेऱ्या

रमाबाई नगरातील सर्वेक्षणाच्या वेळी अनुपस्थित असल्याने, तसेच घरे बंद असल्याने काही रहिवाशांचे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. त्यामुळे काही जण अपात्र ठरले आहेत. त्यांचे सर्वेक्षण करून त्यांची पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी का केली नाही? उच्च न्यायालयाची एमपीसीबीला विचारणा

तीन कंपन्यांच्या निविदा

वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची निुयक्ती करण्यासाठी मार्चमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या निविदेला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. हितेन सेठी अ‍ॅण्ड असोसिएट, संदीप शिकरे अ‍ॅण्ड असोसिएट आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंग या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या निविदांची छाननी करून आठवड्याभरात निविदा अंतिम केली जाईल, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.