मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येथील १६,५७५ पैकी आता १४,४५४ झोपड्यांचेच पुनर्वसन केले जाईल. उर्वरित झोपड्या किनारपट्टी नियंत्रण नियमावलीत (सीआरझेड) बाधित असल्याने त्या वगळण्यात आल्या आहेत. प्रकल्पात समाविष्ट झोपड्यांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगात सुरू असून आजवर ८,५५५ झोपड्या पात्र ठरल्या आहेत.

मुंबई महागर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्गाचा छेडानगर-ठाणे दरम्यान विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. विस्तारीकरणात रमाबाई नगरातील १,६९४ झोपड्या बाधित होत आहेत. या झोपड्यांसह संपूर्ण रमाबाई नगरातील झोपड्यांचा एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करणार आहे. त्यानुसार झोपुने झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणाप्रमाणे रमाबाई आंबेडकर नगरातील १६,५७५ पैकी १४,४५४ झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती झोपुतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. उर्वरित झोपड्या किनारपट्टी नियंत्रण नियमावलीत मोडत असल्याने त्यांना वगळण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पात समाविष्ट १४,४५४ झोपड्यांपैकी आजवर ८,५५५ झोपड्या पात्र ठरल्या असून ५,८९९ झोपड्यांची पात्रता निश्चिती झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो ३’ रखडली; सीएमआरएस, अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्राची प्रतीक्षा; टप्पा ६ मधील कामेही अपूर्ण

पात्रता निश्चिती झालेल्या झोपडीधारकांबरोबर करार करण्याची कार्यावही ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून सुरू आहे. आतापर्यंत अंदाजे दोन हजार झोपडीधारकांबरोबर करार झाल्याचे समजते. आता उर्वरित झोपड्यांच्या पात्रता निश्चितीला वेग देण्यात येणार आहे. शक्य तितक्या लवकरच पात्रता निश्चिती पूर्ण करून झोपड्या रिकाम्या करण्यात येणार आहेत. झोपु प्राधिकरण रिकामी झालेली जागा ‘एमएमआरडीए’कडे वर्ग केली जाईल.

१९ ऑगस्टला धनादेश

पहिल्या टप्प्यात ४,०५३ झोपड्या हटवून जागा रिकामी करून घेण्यात येणार आहेत. ‘क्लस्टर एन-१९’मधील या झोपड्या असून आता करारनामा झालेल्या पात्र झोपडीधारकांना घरभाड्याचा धनादेश वितरीत केला जाणार आहे. घाटकोपर येथे १९ ऑगस्ट रोजी एक कार्यक्रम होणार असून त्यात प्रातिनिधिक स्वरूपात २०० जणांना धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवानंतर कार्यवाही

धनादेशाच्या रक्कमेचे वाटप झाल्यानंतर झोपुकडून तात्काळ झोपड्या रिकाम्या करून घेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४,०५३ झोपड्या रिकाम्या करून घेण्यात येणार आहेत. झोपड्या रिकाम्या केल्यानंतर त्या हटवून जागा मोकळी करून ती एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबई : २,३९८ घरांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे, पत्राचाळीत उच्च गटासाठी १००० चौरस फुटांची १३३ घरे, मात्र अत्यल्प गट बाद

घरभाडे रक्कम

निवासी – १५ हजार रुपये प्रति माह

अनिवासी – २५ हजार रुपये झोपडपट्टीच्या आतील दुकानांसाठी

३० हजार रुपये प्रतिमाह अंतर्गत रस्त्यावरील दुकानांसाठी

३५ हजार रुपये प्रतिमाह महामार्गावरील दुकानांसाठी