मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिसरातील घरविक्रीने उच्चांक गाठला असून आता नऊ महिन्यांपर्यंतच ६५ हजार घरांची विक्री झाली आहे. करोनापूर्व २०१९ मध्ये वर्षभरात झालेली विक्री ६० हजारांच्या घरात होती. त्यानंतर २०२० व २०२१ मध्ये झालेल्या घरविक्रीच्या तुलनेत यंदा सप्टेंबरअखेरपर्यंतच वर्षभरातील घरविक्रीचा आकडा पार झाला आहे. नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल व नाईट फ्रॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनापूर्व काळातील घरविक्रीचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत ६५ हजार ६५० घरे महानगर प्रदेशात विकली गेली आहेत. २०१९मध्ये वर्षभरातील घरविक्रीचा आकडा ६० हजार ९४३ होता.  २०२०मध्ये ४८ हजार ६८८ तर २०२१मध्ये ६२ हजार ९८९ घरविक्री झाली होती. त्यामुळे २०१९पासून आतापर्यंत महानगर परिसरात घरविक्री वाढल्याचे दिसून येत आहे. एक कोटीपर्यंतच्या घरांना यंदा चांगली मागणी होती तर एक ते दोन कोटीपर्यंतच्या घरविक्रीतही पहिल्यांदाच वाढ दिसून आली. सर्वाधिक मागणी एक कोटीपेक्षा कमी किमतीच्या घरांना होती, असेही या अहवालावरून स्पष्ट होत आहे.