मुंबई : टास्क फसवणुकीच्या माध्यमातून सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी त्यांना विविध टास्कच्या नावाखाली अवघ्या तीन दिवसांत ११ लाखांना गंडवले आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. बँक व्यवहारांच्या माध्यमातून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

भायखळा परिसरात राहणाऱ्या ५८ वर्षीय अधिकाऱ्याच्या क्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सव्वाला बाराच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना संदेश आला. त्यात घरबसल्या नोकरीबाबत नमुद केल्यामुळे तक्रारदार यांनी काम करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार सलोनी सिन्हा नावाच्या महिलेने त्यांना तीन लिंक पाठवल्या. त्यावरून ते टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्यांना टेलिग्रामद्वारे वेगवेगळे टास्क पूर्ण करण्याचे काम दिले. त्यासाठी त्यांना टेलिग्राम ग्रुपवर एक कोड क्रमांक देण्यात आला. टास्क पूर्ण करताच खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यांना वेगवेगळ्या संकेतस्थळावर जाऊन लाईक आणि प्रतिक्रिया (रिव्ह्यू) देण्यास सांगितले. या कामाचे त्यांच्या टेलिग्राम आयडीवर ३८ हजार रुपये जमा झाल्याचे दाखवले. ती रक्कम त्यांच्या बँक खात्यातही जमा झाली. त्यामुळे तक्रारदार यांचा या संपूर्ण प्रक्रियेवर विश्वास बसला.

हेही वाचा – Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन

पुढे जास्तीच्या नफ्यासाठी आरोपींच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या खात्यात पैसे हस्तांतर करण्यास सुरुवात केली. सर्व रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी आणखी ३ लाख रुपये भरल्यानंतर सर्व रक्कम जमा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे फसवणूक होत असल्याचा संशय येताच त्यांनी व्यवहार थांबवले. मात्र तोपर्यंत त्यांनी १० लाख ९८ हजार रुपये गुंतवले होते. १९३० सायबर मदत क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दिली. पुढे आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलीस गुन्हा नोंदवून अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – Mumbai Traffic Issue: मुंबईच्या वाहतूक समस्येवरचा उपाय; MMRDA नं मंजूर केले ५८ हजार कोटींचे प्रकल्प; पाच वर्षांत होणार मनस्तापातून सुटका?

याप्रकरणी प्राथमिक तपासात २६ विविध व्यवहारांद्वारे तक्रारदार यांनी ही रक्कम आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांंमध्ये जमा केली आहे. त्यासाठी त्यांच्या नातेवाईकानेही ५० हजार रुपये जमा केले होते. तसेच आरोपींनी चार विविध टेलिग्राम आयडीवरून तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांच्याबाबत माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. बँक व्यवहारानुसार बँक खाते इतर राज्यांमधील आहेत. त्यातील रक्कम गोठवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे सराईत टोळी असल्याचा संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.