MMRDA Plan on Mumbai Traffic Issue: मुंबईची जशी स्वप्नांचं शहर, नोकरीचं शहर, उंचच उंच इमारतींचं शहर, राजधानीचं शहर अशी ओळख आहे, तशीच मुंबईतल्या समस्यांमुळेही शहराची वेगळीच अशी ओळख तयार होऊ लागली आहे. मुंबईतले खड्डे, मुंबईच्या लोकलमधली गर्दी, मुंबईचं अस्ताव्यस्त वाढणं अशा अनेक समस्यांप्रमाणेच मुंबईतली दिवसेंदिवस अधिकाधिक उशीराने होणारी वाहतूक ही समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. मात्र, आता या समस्येवर रामबाण उपाय एमएमआरडीएनं प्रस्तावित केला असून त्याला मंजुरीही मिळाली आहे. त्यानुसार येत्या पाच वर्षांमध्ये मुंबईत तब्बल ५८ हजार कोटींची कामं केली जाणार आहेत!

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, एमएमआरडीएनं मुंबईत येत्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं जाळं उभारण्यासाठी ५८ हजार कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामुळे शहराची वाहतुकीच्या भीषण समस्येतून सुटका होईल असं मानलं जात आहे. तसेच, याचा परिणाम सरतेशेवटी मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ कमी होण्यात होऊ शकेल.

९० किलोमीटरच्या रस्त्यांची उभारणी!

एमएमआरडीएनं मंजूर केलेल्या योजनेनुसार मुंबईत येत्या पाच वर्षांत ९० किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहेत. यात वेगवेगळ्या भागातील रस्ते, उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचा समावेश आहे. मुंबई शहरातील सर्व भागांमध्ये हे रस्त्यांचं जाळं विखुरलेलं आहे. त्यामुळे मुंबई उपनगरांमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांनाही मुंबईत येण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ कमी होऊ शकेल. तसेच, उत्तरेकडे, दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राशी मुंबईला जोडणाऱ्या रस्त्यांमध्येही वाढ झाल्यामुळे शहराच्या सीमांवर होणारी वाहतूक कोंडी सुटू शकेल, असं सांगितलं जात आहे.

Mumbai Traffic: ४५ हजार कोटींच्या प्रकल्पांना गती; आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली

गेल्या काही वर्षांत मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामं झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील पायाभूत सुविधांवर त्याचा मोठा ताण येत असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. मग ते रस्ते वाहतूक असो किंवा मुंबईची लोकल. त्यामुळे मुंबईकरांसाठी शहरांतर्गत व शहराच्या बाहेर जाणारा प्रवास जिकिरीचा होत आहे. मात्र. आता एमएमआरडीएनं शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करता येईल, असं एमएमआरडीएचं नियोजन आहे.

कोणत्या रस्त्यांचा आहे समावेश?

MMRDA नं मंजूर केलेल्या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने शहराच्या आतील आणि बाहेरील बाजूला असणाऱ्या सात रिंग रोडचा समावेश आहे. सध्या हे प्रकल्प निविदा प्रक्रियेच्या स्तरावर आहेत. या प्रकल्पांसाठी एमएमआरडीएसोबत मुंबई महानगर पालिका, महाराष्ट्र रस्ते वाहतूक विकास प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हेही एकत्रित काम करणार आहेत.

उत्तन-विरार लिंक रोड, भायंदर-फाउंटेन हॉटेल कनेक्टर, मीरा भायंदर-दहिसर रोड, वर्सोवा-दहिसर लिंक रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, पश्चिम द्रुतगती मार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंक, पूर्व द्रुतगती मार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, वरळी-शिवडी कनेक्टर, मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू, ऑरेंज गेट टनेल, जेएनपीटी रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, विरार-अलिबाग कॉरिडॉर, इस्टर्न फ्रीवे, छेडा नगर ते आनंद नगर मार्ग, आनंद नगर-साकेत उड्डाणपूल, ठाणे कोस्टल रोड, गायमुख-घोडबंदर भुयारी मार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर, वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग अशा मुख्य मार्गांनी मुंबईतली, मुंबईबाहेर जाणारी व मुंबईमध्ये येणारी वाहतूक प्रामुख्याने होणार असून या प्रकल्पांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील काही प्रकल्प पूर्ण, काही चालू, काही निविदा अवस्थेत तर काही नियोजन अवस्थेत आहेत.

“शहराच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला पोहोचायला एका तासाच्या वर लागता कामा नये. देशात अशी मोजकी शहरं असतील, जिथे रिंग रोडचं असं जाळं आहे. खरंतर मुंबई हे असं पहिलं शहर ठरेल, जिथे समुद्रातून, खाड्यांमधून, वन क्षेत्रातून आणि अगदी शहरी भागातील महामार्गातूनही भुयारी वा उड्डाणपुलाच्या माध्यमातून जाणारे रिंग रोड असतील”, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.