मुंबई : मुंबई विद्यापीठाकडे संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमच तयार नसल्याने शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम सुरू करता आलेले नाहीत. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी या अभ्यासक्रमापासून वंचित राहिले आहेत. मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यासाठी गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून बीबीए, बीसीए आणि बीएमएस हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच ‘एआयसीटीई’ने आपल्या अखत्यारित आणण्याचा निर्णय घेतला होता. तसेच हे अभ्यासक्रम राबवण्यासाठी महाविद्यालयांना ‘एआयसीटीई’ची मंजुरीही अनिवार्य करण्यात आली. त्यानंतर ‘एआयसीटीई’च्या परिपत्रकानुसार या अभ्यासक्रमांसाठी बहुसंख्य व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी आवश्यक शुल्क भरून अर्ज केले होते. हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्यास मान्यताही मिळाली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाकडे मान्यतेसाठी रितसर शुल्क भरून अर्ज सादर करण्यात आले. परंतु या अभ्यासक्रमांसाठी संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमच तयार नसल्याने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही, असे मुंबई विद्यापीठाकडून संबंधित महाविद्यालयांना कळवले आहे.

हेही वाचा…बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आरोपींनी संकेतस्थळावरून घर भाड्याने घेतल्याचे उघड

‘वास्तविक विद्यापीठात अभ्यास मंडळ स्थापन करून या अभ्यासक्रमांना मान्यता देणे आवश्यक होते. सदर अभ्यासक्रम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर नामांकित विद्यापीठात अनेक वर्षांपासून राबविले जातात. त्यामुळे विद्यापीठाने त्वरित पावले उचलावीत आणि सदर अभ्यासक्रमांसाठी अभ्यास मंडळे स्थापन करून अभ्यासक्रम तयार करावा. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्रही दिले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून हे अभ्यासक्रम सुरु केले नाही, तर युवासेना तीव्र आंदोलन करेल आणि कुलपती तथा राज्यपालांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे निवेदन सादर करेल’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.