मुंबई : परीक्षांचे विस्कळीत नियोजन व निकाल विलंबामुळे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ नेहमीच चर्चेत असते. विधि शाखेच्या नवव्या सत्र परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचा काही विद्यार्थ्यांचा निकाल दीड महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही जाहीर झालेला नाही, परंतु ‘एटीकेटी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची अद्यापही प्रतीक्षा असल्यामुळे ‘एटीकेटी’ परीक्षेसाठी जायचे का ? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत पाचवे वर्ष विधी शाखा नवव्या सत्राची परीक्षा (पाच वर्षीय अभ्यासक्रम) ५ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ३ एप्रिल २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी १५ एप्रिलपर्यंत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केले. तसेच, या दरम्यान विद्यार्थ्यांनी ‘एटीकेटी’ परीक्षेसाठीही अर्ज भरले. मात्र, दीड महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही काही विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर १३ ते २४ जून २०२४ या कालावधीत पाचवे वर्ष विधी शाखा नवव्या सत्राची (पाच वर्षीय अभ्यासक्रम) ‘एटीकेटी’ परीक्षा घेण्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर न झाल्यामुळे ‘एटीकेटी’ परीक्षेसाठी जायचे का ? पुनर्मूल्यांकनाचा निकाल ‘एटीकेटी’ परीक्षेपूर्वी लागेल का ? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. परिणामी, विद्यार्थी संभ्रमात असून उच्च शिक्षण व नोकरीची संधी मिळवताना अडचणी निर्माण होण्याची भीतीही विद्यार्थ्यांमध्ये आहे.

हेही वाचा : मुंबई: महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपडीवासीयांची इमारत धोकादायक घोषित! गच्चीवर बुलडोझर नेऊन इमारतीचे पाडकाम

दरम्यान, विधि शाखेच्या पाचव्या वर्षाअंतर्गतच्या नवव्या सत्राच्या फक्त १९ विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकन अर्जावर कार्यवाही करणे बाकी आहे. या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन तातडीने करून निकाल जाहीर करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले. ‘मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून नियमित सत्र परीक्षा, पुनर्मूल्यांकन तसेच ‘एटीकेटी’ परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात कमालीचा विलंब होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक आणि उच्च शिक्षण व नोकरीच्या दृष्टीने असणारे नियोजन विस्कळीत होत आहे. विधि शाखेच्या नवव्या सत्र परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल तात्काळ जाहीर करावा, अन्यथा ‘एटीकेटी’ची परीक्षा पुढे ढकलावी’, असे मत शिंदे गटाच्या युवा सेनेचे उपसचिव ॲड. सचिन पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : मुंबई: कामा रुग्णालयात आता आयुर्वेदिक उपचार, बाह्यरुग्ण विभाग सुरू

पुनर्मूल्यांकन सुविधेचा फायदा काय ?

कोणत्याही परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले व अनुत्तीर्ण विद्यार्थी हे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात. जेणेकरून पुनर्मूल्यांकन प्रक्रियेद्वारे उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी होऊन सुधारित गुण पाहता येतील. परंतु पुनर्मूल्यांकनासाठी वेळेत अर्ज भरूनही पुनर्मूल्यांकनाचाही निकाल जाहीर होण्यास जवळपास दोन महिन्यांचा विलंब होत असेल, तर पुनर्मूल्यांकन सुविधेचा फायदा काय ? मी विधि शाखेच्या नवव्या सत्र परीक्षेच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकन व ‘एटीकेटी’ परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. मात्र, अद्यापही पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर न झाल्यामुळे ‘एटीकेटी’ परीक्षेस जायचे की नाही ? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे, अशी खंत एका विद्यार्थ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली.