मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यंदा १३ हजार ४०६ मतदारांपैकी जवळपास ५५ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानुसार ७ हजार २०० मतांपैकी ६ हजार ६८४ मते वैध आणि ५१६ मते अवैध ठरली आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना विजयासाठी जवळपास १ हजार ११४ मतांचा कोटा पार करणे आवश्यक आहे.

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत युवा सेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने सर्वच्या सर्व जागांवर उभे केले आहेत. त्यामुळे मुख्य लढत ही युवा सेना आणि ‘अभाविप’ यांच्यात होत आहे. तसेच नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी १५, तर प्रत्येकी १ जागा असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातून २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ३, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून ३, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी ३, महिला प्रवर्गातून २ असे एकूण २८ उमेदवार १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर राखीव प्रवर्गातून पाचही जागांवर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे उमेदवार आघाडीवर असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.

हेही वाचा – मुंबई : गर्दीमुळे लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू

हेही वाचा – मुंबई : टाटा रुग्णालयातील प्रोटॉन उपचार पद्धती रुग्णांसाठी वरदान

‘युवा सेनेने राखीव प्रवर्गातील सर्व जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. या उमेदवारांना सुमारे पाच हजार मते मिळाली आहेत. तर ‘अभाविप’च्या उमेदवारांना ८०० ते १ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे हे उमेदवार निश्चितच विजयी होतील, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. शिंदे – भाजप सरकार सुरुवातीपासूनच रडीचा डाव खेळत होते. परंतु तरीही आम्ही सर्व जागांवर विजय संपादन करू,’ असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.