मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचातर्फे सर्व १० जागांसाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. मात्र ही निवडणूक एका वर्षात दुसऱ्यांदा अचानकपणे स्थगित केल्यानंतर विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरणही तापले आहे. त्याचे पडसाद आता मुंबईत उमटू लागले असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यामुळे मुंबई विद्यापीठ फोर्ट संकुलात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांना काही काळ ताब्यात घेतले होते. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

‘वंदे मातरम्’, ‘कुलगुरू तुम्ही एक काम करा; खुर्ची सोडून आराम करा’, ‘चालणार नाही, चालणार नाही हुकूमशाही चालणार नाही’ आदी घोषणा देत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या राजकीय लोभापायी सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांसह मुंबई विद्यापीठ प्रशासनावर टीका करण्यात आली. तसेच मुंबई विद्यापीठ आणि राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ‘अभाविप’चे शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : महापालिकेत आता चेहरा पडताळणीद्वारे हजेरी

हेही वाचा – धारावीतील अनधिकृत प्रार्थनास्थळावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला

‘अभाविप’ कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे वारंवार दुर्लक्ष करत असतानाच स्वतःच्या राजकीय लोभापायी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकला आहे. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक एका दिवसावर आली असताना पुढे ढकलणे हे अत्यंत दुर्दैवी आहे’.