मुंबई: वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात देवनार पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी काही रिक्षा चालकांविरोधात गुन्हाही दाखल केला असून पोलिसांनी आठ रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून गोवंडी – शिवाजी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले होते. रिक्षामधून तीन प्रवाशांना घेऊन जाण्यास परवानगी आहे. असे असताना चालक पाच ते सहा प्रवाशांना रिक्षातून घेऊन जात होते. यामुळे अपघात होण्याच्या शक्यतेमुळे काही नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन देवनार पोलीस, वडाळा परिवहन विभाग आणि मानखुर्द वाहतूक विभाग यांनी संयुक्तरित्या गुरुवारी गोवंडी परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाई सुरू केली होती.

हेही वाचा – संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल

हेही वाचा – मुंबई : अंगावर पाणी उडाल्याने अन्नपदार्थ घरी पोहोचविणाऱ्याने केला चाकू हल्ला

u

नियम धाब्यावर बसवून रिक्षातून प्रवाशांची अवैध वाहतूक करणे, वाहतुकीचे नियम मोडून भरधाव वेगात वाहन चालविणे, रस्त्यावर अनधिकृरित्या वाहने उभी करणे आदी प्रकरणी एकूण ५५ रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्यात आली. यापैकी आठ रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या चालकांच्या रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. तसेच अन्य १२ रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. परिसरात सुरू असलेल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.