मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून रविवारी हा पाणीसाठा ८ टक्क्यांपेक्षा कमी झाला होता. राज्य सरकारने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यापैकी उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात झाली असून भातसा धरणात केवळ साडेतीन टक्के पाणी असून काही दिवसांत या धरणातील राखीव साठ्याच्या वापरालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता पाण्यासाठी राखीव साठ्यावरच मुंबईकरांची भिस्त आहे.

उकाडा प्रचंड वाढत असून सर्वचजण पावसाची वाट बघत आहे. तर धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे पालिकेच्या यंत्रणेचेही पावसाच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांतील पाणीसाठा सध्या केवळ ७.५९ टक्क्यांवर आला आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून १ लाख ९ हजार ८९० दशलक्षलीटर म्हणजेच ७.५९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी २०२३ मध्ये २ जूनरोजी पाणीसाठा १२.२८ टक्के होता तर त्याआधीच्यावर्षी पाणीसाठा १७.०३ टक्के होता.

हेही वाचा – मुंबई : सीएसएमटीपर्यंत लोकल सुरू

मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. पालिकेच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी मुंबईकरांची तीन दिवसांची मागणी पूर्ण करते. म्हणजेच महिन्याला सुमारे १२ ते १३ टक्के पाण्याचा वापर होतो. मात्र उन्हाच्या झळा बसू लागल्या असून उन्हामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफही होते असते. तसेच जूनमध्ये पावसाला पुरेशी सुरुवात होत नाही. त्यामुळे धरणातील पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरवावे लागते. मात्र यंदा पाणीसाठा वेगाने खालावला असून राखीव साठा वापरण्याची वेळ आली आहे. तसेच राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला राखीव साठा वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर तर उर्ध्व वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्षलीटर राखीव साठ्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी जुलै महिनाअखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे.

धरणांमध्ये थोडे पाणी असल्यामुळे यंदा आतापर्यंत राखीव साठा वापरण्याची वेळ आली नव्हती. मात्र उर्ध्व वैतरणा धरणातील पाणीसाठा शून्यावर आला असून या धरणातील राखीव साठ्याच्या वापराला सुरुवात झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तर शहराला दररोज सर्वाधिक म्हणजे १८५० दशलक्षलीटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात केवळ ३.३३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत भातसा धरणातील राखीव साठा देखील वापरावा लागणार आहे.

हेही वाचा – चरस तस्करीप्रकरणातील आरोपीला एनसीबीकडून अटक

बुधवारपासून १० टक्के पाणी कपात

धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत ३० मेपासून ५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तर बुधवार ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही ५ टक्के आणि १० टक्के कपात लागू आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

कोणत्या धरणात किती टक्के पाणी

उर्ध्व वैतरणा …..०००

मोडक सागर ….१५.५७ टक्के

तानसा ….२६.१२ टक्के

मध्य वैतरणा ……१०.४३ टक्के

भातसा ….३.३३ टक्के

विहार ….२०.१६ टक्के

तुलसी …….२८.७ टक्के