मुंबई: येत्या पावसाळ्यात उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी, पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणांची संयुक्त पाहणी करून उपाययोजना आखाव्यात. तसेच रेल्वेमध्ये सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सर्व यंत्रणांना दिले.
यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी बैठक संपन्न झाली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, मुंबई इमारत व पुनर्वसन मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्यासह सातही परिमंडळांचे उप आयुक्त, सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तट रक्षक दल, नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), मुंबई वाहतूक पोलिस, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक (बेस्ट), टाटा पॉवर, अदानी एनर्जी आदींच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर होते. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
पाणी उपसण्यासाठी ४८२ पंप …..
जोरदार पावसाच्या काळात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यंदादेखील शहर आणि उपनगरात मिळून ४८२ ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत. त्यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले.
नागरिकांना आपत्तीसमयीचे प्रशिक्षण …….
मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असलेली संभाव्य ठिकाणे आहेत. याठिकाणी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच, संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना द्याव्यात, आपत्तीसमयीचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देशदेखील आयुक्तांनी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, कीटक नियंत्रण विभाग, आणि प्रमुख रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जलजन्य आजार, साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देखील श्री.गगराणी यांनी दिले.