मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात जप्ती, लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याअंतर्गत पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने ‘डीबीएस रिॲलिटी कंपनी’ च्या चांदिवली येथील एकूण १८ मालमत्तांवर टाच आणली आहे. या थकबाकीदार आस्थापनेकडे एकूण १७८ कोटी ६४ लाख रूपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार कंपनीने विहित २१ दिवसांत करभरणा न केल्यास मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरपालिकेने सातत्याने आवाहन आणि पाठपुरावा केल्यानंतरही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर पालिकेतर्फे जप्ती आणि अटकावणीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी – व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या आदेशांनुसार आणि सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. आता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत करनिर्धारण व संकलन खात्याने संघर्षनगर – चांदिवली येथील ‘डीबीएस रिॲलिटी कंपनी’ च्या एकूण १८ मालमत्तांवर टाच आणली आहे. या थकबाकीदार आस्थापनेकडे भूखंड करनिर्धारणापोटी एकूण १७८ कोटी ६४ लाख रूपयांची थकबाकी प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने संपूर्ण १८ मालमत्तांवर जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे. येत्या २१ दिवसात कर भरणा न केल्यास कलम २०४, २०५ अंतर्गत मालमत्तेतील वस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे.

पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ६ हजार २०० कोटी रूपये कर संकलनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यादृष्टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. २६ मे २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ४ हजार ८२३ कोटी रूपये कर संकलन झाले आहे. म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत उर्वरित १ हजार ३७७ कोटी रूपये कर संकलन करावे लागणार आहे. कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या, तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे.