महाराष्ट्र राज्य गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंदीचे राज्य आहे. मागील ६० वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात मोठ-मोठे उद्योग उभे राहिले. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या म्हणून महाराष्ट्र देशात प्रगत राज्य म्हणून नाव लौकिक मिळालेला आहे. परंतु केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकारने असताना महाराष्ट्रात होत असलेली गुंतवणूक गुजरातमध्ये जात होती, तेंव्हा शिंदे फडणवीस सरकार काय झोपा काढत होते का? असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

हेही वाचा – “…तर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता,” ‘अहंकारी राजा, विलासी राजपूत्र’ म्हणत आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका

“राज्यातली दोन लाख कोटींची गुंतवणूक व लाखो रोजगार गुजरातला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन पाळले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोकळ दावे करत आहेत. मोठे प्रकल्प गेले आणि त्या बदल्यात आलेल्या गुंतवणुकीवर केंद्र सरकारचे आभार कसले मानता? दोन वर्षात महाराष्ट्रात काहीच झाले नाही, असा आरोप करत सर्व खापर महाविकास आघाडीवर फोडत आहेत. फॉक्सकॉन मविआच्या काळातच गुजरातमध्ये गेला दावा करणाऱ्या फडणवीसांनी, १५ जुलै २०२२ रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक कशासाठी घेतली होती, याचा खुलासा करावा. फडणवीस व भाजपाने मोदी सरकारकडे जाऊन महाराष्ट्राची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली पाहिजे, यासाठी काय प्रयत्न केले ते सांगावे. दिल्लीतील वरिष्ठांच्या इशाऱ्यावर खाली मान घालून गप्प बसतात आणि खोटे बोल पण रेटून बोल, या पद्धतीने वागत आहेत”, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा – “माझ्याशी समोरासमोर चर्चेला या,” आदित्य ठाकरेंचं पत्रकार परिषदेतून CM एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान

दरम्यान, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याच्य़ा निषेधार्थ राजभवनसमोर, ‘महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले, शिंदे-फडणवीस यांनाही घेऊन जा, महाराष्ट्र सुखी होईल’ अशा आशयाचे फलक काँग्रेसकडून झळकवण्यात आले होते.