राज्यातील धार्मिक तणाव, दगडफेक, तोडफोड या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. “महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे?” असा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
“मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा”
नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात पोलिसांचे नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगाराचे राज्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा.”
“औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले?”
“या सरकारच्या काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरु आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरु आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत? शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते ते खरेच आहे. संभाजीनगर, अहमदनगर, शेवगाव, अमरावती, नाशिकमध्ये धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं म्हणत नाना पटोलेंनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पंचनामा केला.
“फडणवीस जाणिवपूर्वक दगडफेकीकडे दुर्लक्ष करत आहेत का?”
नाना पटोले पुढे म्हणाले, “पोलीस खात्याचा वचक असेल तर गुन्हेगारांची अशी हिंमत होणार नाही. राज्यात धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजपाचा कुटील डाव आहे. त्यामुळे फडणवीस जाणिवपूर्वक अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत का? राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे गृहविभागाचे काम आहे पण गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा काय करते आहे? हा राज्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. माझ्या व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने १९ मे रोजी या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत आणि महिला सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. पण दुर्देवाने या संदर्भात काहीच कारवाई होताना दिसत नाही.”
हेही वाचा : संगमनेरमध्ये दगडफेक-गाड्यांची तोडफोड कुणी केली? समनापूरचे प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा म्हणाले…
“मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांकडील गृहखाते तात्काळ काढून घ्यावं”
“गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे पण सरकार केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये व्यस्त आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. फडणवीस यांच्याकडे गृह खात्याबरोबरच अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण, राजशिष्टाचार अशा सहा विभागांचा कारभार असून सहा जिल्ह्यांचे ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते गृह विभागाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. फडणवीस यांच्याकडील गृहखाते तात्काळ काढून घ्यावा आणि राज्याला अनुभवी, सक्षम व पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा,” अशी मागणी नाना पटोलेंनी केली.