मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वितरण विद्यार्थ्यांना ११ जून रोजी करण्यात आले. मात्र, नवी मुंबईतील नेरुळ येथील सेंट ऑगस्टीन शाळेतील एका विद्यार्थ्याने इयत्ता नववीला गेलेल्या सहलीचे निम्मे शुल्क भरल्यामुळे शाळा प्रशासनाने त्याचा इयत्ता दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखल्याअभावी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होण्याची भीती विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नावनोंदणीस मुदतवाढ; १९ जूनपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी, २६ जूनला पहिली गुणवत्ता यादी

नवी मुंबईतील नेरुळ येथील सेंट ऑगस्टीन शाळेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची सहल २०२३ साली गेली होती. सहलीचे एकूण शुल्क १५ हजार रुपये होते. मात्र एवढे भरमसाठ शुल्क परवडत नसल्याचे सांगत एका विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या मुलाला सहलीला न पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्याबाबत शाळा प्रशासनालाही सांगितले. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना सहलीला येणे बंधनकारक असल्याचे शाळा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे, कशीबशी पैशांची जमवाजमव करत संबंधित पालकांनी नाईलाजास्तव १५ हजार रुपयांपैकी ६ हजार रुपये भरले आणि मुलाला सहलीसाठी पाठविले. मात्र, आर्थिक चणचणीमुळे उर्वरित ९ हजार रुपये भरणे पालकांना शक्य झाले नाही. त्यामुळे, संबंधित विद्यार्थ्याची दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला सेंट ऑगस्टीन शाळेने अडवून ठेवला आहे. सहलीचे उर्वरित ९ हजार रुपये काही महिन्यांनंतर निश्चितच देतो, असे पालकांनी सांगूनही शाळा प्रशासनाने दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही.

हेही वाचा >>> शीना बोरा प्रकरण :पोलिसांनी हस्तगत केलेली हाडे आणि अवशेष गहाळ; सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती

‘माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सहलीचे उर्वरित ९ हजार रुपये आताच देऊ शकत नाही, मात्र काही महिन्यांनंतर निश्चितच देईन, अशी विनंती मी शाळा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, शाळा प्रशासन आमची बाजू समजून घ्यायला तयार नाही. मुख्याध्यापिकांची भेट होत नाही. दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला नसल्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होणार आहे’, अशी खंत संबधित विद्यार्थ्याच्या पालकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत सेंट ऑगस्टीन शाळेच्या प्रशासनाशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

‘विविध कारणास्तव अनेक शाळा या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला स्वतःकडे अडवून ठेवतात. मात्र, शिक्षण विभागाचे अधिकारी संबंधित शाळांवर कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहेत. गवतवर्षी गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला अडवून ठेवणाऱ्या एकाही खासगी शाळेवरची कारवाई पूर्ण झालेली नाही, त्यामुळे अशा शाळांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जर अशा शाळा प्रशासनांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नवी मुंबईतील नेरुळ येथील सेंट ऑगस्टीन शाळेच्या विद्यार्थ्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल समाजसेवक धिरज कांबळे यांनी माहिती दिली. त्यानंतर मी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल करत शाळा प्रशासन व मुख्याध्यापिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्याची दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला तात्काळ देण्यात यावा’, असे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी महासंघाच्या नितीन दळवी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.- संदीप संगवे, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai school withholds ssc mark sheet over half payment of picnic charges mumbai print news zws