शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत आपण मोठे खुलासे कऱणार असल्याचं जाहीर केलं असून यावेळी ते काय सांगतात याची उत्सुकता आहे. काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला खुलं आव्हान दिलं असून पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्फोटक पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले “कधीतरी शिवसेनेचीही…”

सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मंचावर बोलताना आपण आत्ताच काय ते बोलून घेऊ, तीन वाजल्यानंतर संजय राऊतांचे षटकार असतील असं मिश्कील भाष्य केलं. तसंच कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यांशी बोलतानाही त्यांनी यावर भाष्य केलं.

मुंबईत दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये सुरु असलेल्या ईडीच्या धाडींवर संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले “गुजरातमध्ये कधी…”

“मलाही विषय माहिती नाही. दुपारी पत्रकार परिषद होणार असून फक्त राज्य नाही तर देश या पत्रकार परिषदकडे अपेक्षेने बघत आहे. संजय राऊत काय म्हणतात हे पहावं लागणार आहे. पण जेव्हा साधारण ते असा इशारा देतात तेव्हा ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचंच असेल यावर माझा विश्वास आहे,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

मुंबईत ईडीकडून धाडी सुरु असून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापकर करत दबाव आणला जात आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी संसदेतही या विषयावर बोलले आहे. केंद्र सरकार सातत्याने इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहे. विरोधी पक्षातच या नोटीस कशा येतात याचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. विरोधात असताना येणाऱ्या नोटीशी भाजपात गेलात की कुठे जातात ते देवाला माहित. ही दडपशाही असून सातत्याने लोकांना केंद्र सरकार घाबरवत आहे”.

गुजरातमधील बँक घोटाळ्यासंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, “या देशात कोणत्याही राज्यात झालेल्या घोटाळ्याची जबाबदारी केंद्राने घेतली पाहिजे. सात वर्षांपासून यांचंच सरकार देशात असताना मग काय करत होते? याची व्यापक चर्चा संसदेत करणार आहोत”. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या टीव्ही मालिकेप्रमाणे रोज पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असल्याचा टोला लगावला.

किरीट सोमय्यांवर टीका –

“अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालेलं नाही. आरोप जरुर करावेत, पण या देशात यंत्रणा आहे. तुम्ही सरकारकडे, कोर्टात जा, पण इतक्या वेळा पत्रकार परिषद घेऊन रोज नव्याने आरोप करण्याचा हा ट्रेंड आला आहे. टीव्ही मालिकेच्या जाहिरातीप्रमाणे ते झालं आहे. हे दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही,” अशी टीका सुप्रिया सुळेंनी किरीट सोमय्यांवर केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supriya sule on shivsena sanjay raut press conference sgy