मुंबई : प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या निसर्गदत्त प्रतिभेला कौशल्य व ज्ञानाची जोड मिळाल्यास मनुष्य कोणत्याही वयात मोठी प्रगती करू शकतो, असे सांगून रात्रशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवसायासाठी व ज्ञानवर्धनासाठी शिक्षण घ्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. बैस यांनी सोमवारी सांताक्रूझ येथील उपनगर शिक्षण मंडळातर्फे संचालित विकास रात्र विद्यालयाला भेट दिली आणि काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी घरोघरी वर्तमानपत्रे टाकली, रस्त्यांवरील दिव्याखाली बसून अभ्यास केला आणि पुढे मोठे वैज्ञानिक झाले. दिवसभर काम करून तसेच कुटुंब चालवून रात्र विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली. यावेळी रात्रशाळा समितीचे अध्यक्ष चंद्रहास देशपांडे, मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, विकास रात्र विद्यालयाचे प्राचार्य दीपक कोतेकर आदी उपस्थित होते.