चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईतही १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे अठरा टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. वर्ष २०२१ मध्ये वर्षभरात झालेल्या एकूण मृत्यूपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह नोंदवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने डिसेंबरपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा- परळ टीटी पुलाच्या दुरुस्तीसाठी १८ कोटी; पुलावरील सांध्यांची संख्या कमी करण्याचा महापालिकेचा निर्णय
दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने मधुमेह देखभालीसाठी आरोग्य सेवांपर्यंत पोहोच ही संकल्पना जगभरात राबवली जात आहे. येत्या डिसेंबर २०२२ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्त्यांमध्ये, आरोग्य स्वयंसेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने ३० वर्षे वयावरील व्यक्तींची उच्च रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजार यांची माहिती घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या नजीकच्या महानगरपालिका दवाखान्यांमध्ये तसेच रुग्णालयांमधील असंसर्गजन्य आजार केंद्रांमध्ये जाऊन रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब या दोन्ही गोष्टींची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने मुंबईत सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे अठरा टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्यावतीने सन २०२१ मध्ये केलेल्या नागरी नोंदणी पद्धतीनुसार (Civil Registration System) एकूण मृत्यू नोंदणीपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह असे नोंदवण्यात आले आहे.
हेही वाचा- मुंबई सुशोभीकरण प्रकल्प रखडला; घोषणेला दोन महिने उलटूनही प्रक्रिया निविदा पातळीवरच
महिलांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण
बृहन्मुंबई महानगरपालिकेने महिलांसाठी २६ सप्टेंबरपासून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान सुरू केले आहे. आजपर्यंत, या अभियानामध्ये ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या १ लाख ०३ हजार ४२० महिलांची मधुमेह तपासणी केली. त्यातील ७ हजार ४७५ महिलांना मधुमेह असल्याचे निदान झाले आहे.
जगातील प्रत्येक सात मधुमेही रुग्णांपैकी एक रुग्ण भारतीय ……
आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण (International Diabetes Federation, IDF) या संस्थेच्या सन २०२१ च्या अहवालानुसार, जगातील प्रत्येक सात मधुमेही रुग्णांपैकी एक रुग्ण हा भारतीय आहे. आपल्या देशातील राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१९-२०२० नुसार, पंधरा वर्षे वयावरील निकष लक्षात घेता मुंबईत सुमारे सतरा टक्के महिलांमध्ये तर अठरा टक्के पुरुषांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण १४० मिलिग्रॅम पेक्षा अधिक आढळले आहे.
रक्तदाबही वाढलेला
तीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींच्या चाचण्या करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या १५ रुग्णालयांमध्ये ऑगस्टपासून असंसर्गजन्य आजार केंद्र (NCD Corners) सुरु केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत ३२ हजार ०९६ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी सुमारे १२ टक्के व्यक्तींचा रक्तदाब हा सामान्य पातळीपेक्षा अधिक आढळला आहे तर रक्तातील साखरेचे प्रमाण (random sugar) १४० मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींचे प्रमाण सुमारे ११ टक्के आहे. रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या दोन्ही गोष्टी सामान्य पातळीपेक्षा अधिक असलेल्यांची संख्या देखील ५ टक्के आढळली आहे.
चाचणी कुठे कराल ?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये मधुमेहाची प्राथमिक चाचणी आणि निदान करण्याच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत आणि दर महिन्याला सुमारे ५० हजार रुग्ण मधुमेहासंदर्भातील उपचार घेत आहेत. या बाबी आढळल्यानंतर या सर्व व्यक्तींशी संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
अशी लक्षणे दिसल्यास काळजी घ्या
वारंवार लघवीला जाणे, अचानक वजन कमी होणे, थकवा, अतिशय तहान लागणे, अंधुक, अस्पष्ट दिसणे, हात-पाय सुन्न होणे अथवा त्यावर सूज येणे, पायाला जखम (अल्सर) होणे या प्रकारची लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तींनी तातडीने नजीकच्या महानगरपालिका दवाखान्यांमध्ये अथवा रुग्णालयांमध्ये जाऊन स्वतःची चाचणी करून घेणे आणि आरोग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.