मुंबई : महालक्ष्मी स्थानकावरील उड्डाणपूल सुरू होण्यासाठी आणखी दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. विकास नियोजन आराखड्यानुसार सुरू असलेल्या या उड्डाणपुलांच्या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी पाहणी केली. हा उड्डाणपूल ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी आतापासून नियोजन करावे, असे निर्देश बांगर यांनी यावेळी दिले.
महालक्ष्मी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी विकास नियोजन आराखड्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्यावतीने दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांमुळे वाहतुकीचे नियमन सुरळीत होणार आहे. केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा ‘केबल स्टेड पूल’ रेल्वे रूळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर, तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी २३.०१ मीटर इतकी आहे. तसेच, उत्तरेकडे ई. मोझेस मार्ग ते वरळीकडून धोबी घाट मार्गावरील उड्डाणपुलाची लांबी ६३९ मीटर आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामात येणाऱ्या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी महानगरपालिकेने उड्डाणपुलाच्या संरेखनात बदल केले आहेत. सध्या या दोन्ही पुलांची कामे सुरू असून या कामाची बांगर यांनी पाहणी केली.
केबल स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८ मीटर उंच पायलॉन (मोठा खांब) उभारावा लागणार आहे. त्यासाठी अंदोज २०० दिवस म्हणजेच ७ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्याचबरोबर केबल स्टेड पुलाच्या दोन्ही बाजूंचे काम एकत्रितपणे करावे लागणार आहे. रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने टप्प्याटप्प्याने कायर्वाही केली जाणार आहे. केबल पुलाच्या स्पॅन बांधकामासाठी सुमारे २५० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. याचा विचार करता बांधकामासह पुलाची अनुषंगिक कामे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण व्हायला हवी. यासाठी कामांचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे, असे निर्देश यावेळी बांगर यांनी दिले. हे करत असताना शक्य असेल तेव्हा एकाच वेळी दोन कामे एकत्रित (ओव्हरलॅपिंग) करावीत, जेणेकरून वेळेची बचत होईल. पावसाळ्यात कामे थांबणार नाहीत, अशादृष्टीने नियोजन करावे, असेही निर्देश बांगर यांनी दिले.
पुलाच्या संरचेमुळे काही घरे / आस्थापना बाधित होत आहेत. त्याची कार्यवाही संबंधित विभागांनी (वॉर्ड) पूर्ण करावी. जेणेकरून पुलाचे काम पूर्ण करून पुरेशा रुंदीचा पुलाच्या बाजूचा रस्ता ( स्लीप रोड) वाहतुकीसाठी उपलब्ध करून देता येईल. वाहतूक वळविल्यानंतर पर्यायी रस्ता सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले. यावेळी पूल विभागाचे प्रमुख अभियंता उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.