मुंबई : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक आक्रमक, सर्वाधिक तयारीत आणि सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवसीय विश्वविजेतेपदाची सर्वोत्तम संधी असल्याचे मानले जाते. पण या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान रविवारी अंतिम फेरीत भारतासमोर असेल.

जागतिक क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने महासत्ता असलेल्या या दोन संघांतील लढत चुरशीची व्हावी, अशी लक्षावधी क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे. १९८३ आणि २०११मध्ये भारताने विश्वविजेतेपद मिळवले होते. त्यावेळच्या भारताच्या प्रवासापेक्षा यंदाची वाटचाल खूपच वेगळी ठरलेली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने २००७मध्ये दाखवलेल्या निर्भेळ कामगिरीची तुलना भारताच्या यंदाच्या कामगिरीशी केली जात आहे. भारताची आकडेवारी थक्क करणारी आहे. प्रथम फलंदाजी करताना भारत सरासरी १७५ धावांनी जिंकला. तर लक्ष्याचा पाठलाग करताना सरासरी ६.४ गडी आणि सरासरी ६४.४ चेंडू राखून भारत विजयी ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात इतक्या एकतर्फी वाटचालीचे दुसरे उदाहरण क्वचितच आढळेल. केवळ दोनच सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजी आणि एका सामन्यात गोलंदाजी दडपणाखाली आली. ऑस्ट्रेलियन संघाची वाटचाल तुलनेने फारच अडखळती झाली. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर त्यांच्या चषकावरील दावेदारीविषयीच शंका निर्माण झाली होती. मात्र, जेत्यांची मानसिकता त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावणारे असा त्यांचा लौकिक आहे.

-विश्वचषकाच्या अंतिम फेरीत महासत्तांची टक्कर

-भारतीय विजयरथ रोखण्याचे ऑस्ट्रेलियासमोर आव्हान

 (संबंधित : क्रीडा)