लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: यंदा आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसमधून पंढरपूर गाठले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने २५ जून ते ५ जुलैदरम्यान सुमारे ५ हजार विशेष बस सोडल्या होत्या. या ५ हजार बसच्या १७ हजार ५६६ फेऱ्यांमधून ८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यातून एसटीला २७ कोटी ८८ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाने मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागांमधून विशेष बसगाड्या सोडल्या होत्या. वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळ्या ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर पाच हजार बसगाड्या तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील पार पडलेल्या रिंगण सोहळ्यासाठी एसटीने २०० बस उपलब्ध केल्या होत्या.

आणखी वाचा-नायर रुग्णालयात सप्टेंबरअखेर नवे CT SCAN यंत्र कार्यान्वित होणार

राज्य सरकारने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास व महिलांसाठी तिकीटदरात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. या दोन योजनांमुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत ७ कोटी ६९ लाख रुपये उत्पन्न अधिक मिळाले, तर प्रवासी संख्येत २ लाख ४५ हजार ६७० नी वाढ झाली, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, शेखर चन्ने यांनी दिली.

वर्ष – बसची संख्या – फेऱ्या
२०२२ – ४,८०० – १५,५२४
२०२३ – ५,००० – १७,५६६

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of ashadhi ekadashi 8 lakh 81 thousand varkari travel by st mumbai prit news mrj
Show comments