दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेला साडेसोळा किलोमीटर लांबीचा पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाच्या साडेतेरा किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन अखेर उद्या होत आहे. २००८ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प नानाविध कारणांनी रखडल्याने खर्चात तब्बल ४०३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या वापरासाठी कसलाही टोल नसल्याने या खर्चाचा भार ‘एमएमआरडीए’च्या तिजोरीवरच पडला.पूर्व मुक्त मार्गाचे काम जानेवारी २००८ मध्ये सुरू झाले. जानेवारी २०११ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र वन विभागासह नानाविध परवानग्या, मीठागार क्षेत्रावरील रस्त्याच्या बांधकामासाठी विशेष परवागी यात बराच वेळ गेला. या साऱ्या विलंबात प्रकल्पाचा खर्च जवळपास दीडपटीने वाढला. प्रकल्प हाती घेण्यात आला तेव्हा जानेवारी २०११ पर्यंत ८४७ कोटी रुपये खर्चून तो तयार होईल असे नियोजन होते. पण विलंबामुळे खर्च ४०३ कोटी रुपयांनी म्हणजेच दीडपटीने वाढला आहे.