मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने ५,१५० विद्युत बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार एका कंपनीशी केला. तसेच दर महिन्याला २१५ बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार होते. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसचे उद्घाटनही फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले. परंतु मार्च ते ऑगस्ट २०२४ या महिन्यात पुरवठादार कंपनीकडून एसटीला फक्त ६५ विद्युत बस मिळाल्या आहेत. त्यामुळे कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात यावे. तसेच एसटीच्या स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

एसटी महामंडळातील अनेक बस खिळखिळ्या झाल्या असल्याने प्रवाशांचा प्रवास धोकादायक झाला आहे. अनेक बस रस्त्यातच बंद पडत असल्याने, प्रवाशांचा प्रवास रखडत असून गैरसोयीचा होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळ कंत्राटी पद्धतीने भाडेतत्त्वावर बस खरेदी करण्याचा करार केला. त्यानुसार विदयुत बस कंपनीला प्रति बस २० लाख रुपये इतके अनुदान देणार असून ६५० कोटी विद्युत प्रभारणासाठी (चार्जिंग सेंटर) खर्च होणार आहे. एकूण १७२ ठिकाणी विद्युत प्रभारण केंद्र बांधण्यात येणार असून त्यापैकी काही विद्युत प्रभारण केंद्रे पूर्ण झाली आहेत. तसेच इतर पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी खर्च केला जात आहे. मात्र, विद्युत बसचा पुरवठा न झाल्याने राज्य सरकारच्या पैशांचा नाहक अपव्यय होत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे होणारे नुकसान संबंधित कंत्राटदारांकडून वसूल करण्यात यावेत, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – मुंबई : …अखेर जोग पुलाची दुरुस्ती होणार, उड्डाणपुलाचा ९५ कोटींचा खर्च पालिका करणार, एमएमआरडीएकडून पैसे वसूल करणार

हेही वाचा – मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ

एसटीच्या ताफ्यात आतापर्यंत फक्त ६५ विद्युत बसचा दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत ठाणे विभागात २४, नागपूर विभागात २६, सातारा विभागात ५, नाशिक विभागात १० बस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने स्वमालकीच्या बस खरेदी कराव्यात व त्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बरगे यांनी केली.