लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: पुण्यातील तळेगाव येथील दहा वर्षांपासून रखडलेला डीएसके सदाफुली आणि आताचे नवीन नाव पलाश सदाफुली गृहप्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाला मंगळवारी निवासी दाखला (ओसी) प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता घराचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला असून १६१ सदनिकाधारकांची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपली आहे. निवासी दाखला प्राप्त झाल्याने आता नवीन विकासकाने सदनिकाधारकांना ताबा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या सदनिकाधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

डीएसके समुहाने तळेगावामध्ये २६९ सदनिकांचा समावेश असलेला तीन इमारतींचा डीएसके सदाफुली प्रकल्प २०१२-२०१३ मध्ये जाहीर केला. ग्राहकांनी २०१३ पासून या प्रकल्पात घरनोंदणी सुरू केली. अनेकांनी घराच्या एकूण किंमतीच्या ९० टक्के रक्कमही भरली. २०१५ मध्ये घराचा ताबा मिळणार असल्याने घर खरेदीदार आनंदात होते. मात्र २०१५ मध्ये घराचा ताबा मिळाला नाही. प्रकल्प पूर्ण न झाल्याने आणि त्यात डीएसके यांना अटक झाल्याने प्रकल्प अडकला. या प्रकल्पातील २७९ पैकी अंदाजे १६१ सदनिका विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे या १६१ सदनिकाधारकांची चिंता वाढली. काही सदनिकाधारकांनी एकत्र येऊन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

आणखी वाचा- मुंबईः अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक

दरम्यान, या प्रकल्पातील एका इमारतीचे ७० टक्के, तर उर्वरीत दोन इमारतींचे ८० टक्के काम पूर्ण झाले होते. त्यात टाटा फायनान्सचे साडेसात कोटी रुपयांचे कर्ज होते. व्याज आणि कर्जाची रक्कम मिळून ही रक्कम २२ कोटी रुपयांच्या घरात गेली होती. सदनिकाधारकांनी एकत्र येऊन थेट महारेराकडे धाव घेतली. महारेरानेहा हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी पुढाकार घेतला. एकीकडे सदनिकाधारकांनी एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. तर दुसरीकडे महारेराने हे प्रकरण महारेराच्या सलोखा मंचाकडे पाठवले. दरम्यान, नवीन विकासकाच्या माध्यमातून प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी महारेराने प्रकल्पाची नोंदणी रद्द केली.

सलोखा मंचाचे दोन सदस्य डॉ. निरंजन हिरानंदानी आणि ॲड. शिरीष देशपांडे यांनी सदनिकाधारक, टाटा फायनान्स आणि नवीन विकासक यांच्यामध्ये सलोखा घडवून आणला. टाटा फायनान्सनेही व्याजाची रक्कम माफ केली. त्यानंतर अखेर हा प्रकल्प जी. एस. असोसियट यांना दिला आणि या समुहाने ऑगस्ट २०२२ मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. या प्रकल्पाचे काम १ जानेवारी २०२३ रोजी पूर्ण केले. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सदनिकाधाराकांना घराचा ताबा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र इमारतीला निवासी दाखला प्राप्त झाल्याशिवाय अधिकृतरित्या ताबा देता येत नाही. परिणामी, प्रकल्प पूर्णत्वानंतरही सदनिकाधारकांना घराच्या ताब्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती.

आणखी वाचा- मुंबईः व्यावसायिकाच्या घरातून दोन कोटींच्या दागिन्यांची चोरी; मोलकरणीसह पाच जणांना अटक; पावणे दोन कोटींचे दागिने हस्तगत

अखेर ही प्रतीक्षाही मंगळवारी संपली. पीएमआरडीएकडून या प्रकल्पातील तिन्ही इमारतींना निवासी दाखला प्राप्त झाल्याची माहिती पलाश सदाफुली प्रकल्पातील सदनिकाधारक प्रदीप वांद्रेकर यांनी दिली. निवासी दाखला मिळाल्याबरोबर नवीन विकासकाने घराचा ताबा देण्यास सुरुवात केली आहे. आमची दहा वर्षांची हक्काच्या घराच्या प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे आता सर्व सदनिकाधारक आनंदात आहेत. आम्ही सदनिकाधारकांनी एकत्र येऊन लढा दिला. त्याला महारेरा, सलोखा मंच, तसेच नवीन विकासकाची साथ मिळाली आणि अखेर आमचा लढा यशस्वी झाला, असे वांद्रेकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palash sadafuli housing project in pune has finally received the residential certificate mumbai print news mrj
Show comments