लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेने मरोळ येथे मिठी नदी लगतच्या साडेतीन एकर जागेत शहरी वनीकरणातून उद्यान साकारले असून त्यात देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. १०० प्रजातींच्या १० हजार झाडांमधून फेरफटका करता येईल असा लाकडी साकवही तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात हे हिरवाईने नटलेले उद्यान साकारले असून ते लवकरच सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना विरंगुळ्याचे आणखी एक ठिकाण उपलब्ध होणार आहे.

मुंबईत अनेक प्रकल्पासाठी झाडे कापावी लागतात. त्या तुलनेत नवीन झाडे लावण्यासाठी मुंबईत जागाही शिल्लक नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने एकीकडे शहरी वनीकरण, हरितक्षेत्र वाढवण्यासाठी जपानी पद्धतीची अधिकाधिक मियावाकी वने उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०२० मध्ये महापालिकेने वृक्षारोपण करून मियावाकी वनांच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. कमीत कमी जागेत अधिकाधिक फळझाडे, फुलझाडे अशी मियावाकी झाडे लावण्यात येत आहेत. त्यातच गेल्या वर्षभरापासून मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेटच्या सातबाग परिसरात पालिकेच्या नियोजन विभागाने साडे तीन एकर जागेत शहरी वने विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला. पालिकेच्या नियोजन विभागाने हे उद्यान साकारले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे उद्यान साकारण्यात आले आहे.

आणखी वाचा-Siddhivinayak Temple : प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदरांची पिल्ले? व्हायरल VIDEO वर मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण काय?

या जागेवर महापालिकेची १.९० एकर बाग आहे. तर मरोळ सहकारी औद्याोगिक वसाहतीकडून काही एकरचा शेजारचा भूखंड ताब्यात घेण्यात आला आहे. महापालिकेच्य नियोजन विभागाकडून सुरू असलेल्या या प्रकल्पात १०० प्रजातींची एकूण दहा हजार फळ,फुल झाडांसह विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. तसेच फुलपाखरू गार्डनही विकसित करण्यात आले आहे. या साडे तीन एक जागेत ५०० ते ६०० मीटरचा लाकडी बांधकाम असलेला वॉक वे ही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांनी दिली.

आणखी वाचा-मुंबई : एसटीच्या जमिनीच्या विकासासाठी ६० वर्षांपर्यंत भाडेकरार, भरत गोगावले एसटीचे २४ वे अध्यक्ष

सांडपाण्याचा वापर

आंबा, चिकू, पपई, पेरू, सीताफल, औषधी वनस्पती, बांबू इत्यादी फळ-फुलझाडे यामध्ये लावण्यात आली आहेत. या उद्यानामध्ये येणाऱ्या सांडपाण्याचा नैसर्गिक पद्धतीने वापर करून त्या पाण्याचा वापर हिरवळीसाठी केला जात आहे. कर्दळीच्या झाडांमधून हे पाणी सोडले आहे. कर्दळीच्या झाडांतून हे पाणी स्वच्छ होऊन पुढे वाहत जाते व उद्यानासाठी ते वापरले जाते. त्यामुळे या उद्यानाला पाणी फवारण्यासाठी ट्रॅंकर मागवावा लागत नाही.