मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ ब्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्क्याचे (जेट्टी) काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्याला सुरुवातीपासून कुलाबावासियांनी विरोध केला असून तो दुसरीकडे स्थलांतरित करावा अशी मागणी केली होती. आता त्याला शिवसेना (शिंदे गट) राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथून जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात या प्रवासी संख्येंत आणखी वाढ होण्याचा अंदाज महाराष्ट्र सागरी मंडळाने वर्तविला होता. ही बाब लक्षात घेत सागरी मंडळाने गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी अपोलो बंदर परिसरातील रेडिओ क्लबजवळ एक मोठा धक्का बांधण्याचा निर्णय २०२२ मध्ये घेतला होता. तो बांधण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला. त्यानुसार तेथे एकाचवेळी १० ठिकाणी २० बोटी उभ्या करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. दरम्यान, कुलाबावासियांनी मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध दर्शवला.
स्थानिक समस्यांचा विचार न करता या धक्क्याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ताजमहल पॅलेससमोरील रस्त्यावर नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे तेथील रहिवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता या नवीन धक्क्यामुळे भविष्यात तेथील वाहतूककोंडीची समस्या जटील होऊ शकते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून कुलाब्यातील रहिवासी विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत. गेट वे ऑफ इंडियाच्या ऐवजी हा प्रकल्प प्रिन्सेस डॉक येथे स्थलांतरीत करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
दरम्यान, गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून रोज हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, त्याच परिसरातून बोटींची सततची ये-जा, प्रवाशांची गर्दी आणि धक्क्यावरील गोंधळ यामुळे परिसराचा ऐतिहासिक व पर्यावरणीय समतोल बिघडेल असे देवरा यांनी पत्रात अधोरेखित केले आहे. तसेच मुंबईतच अन्य ठिकाणी प्रवासी धक्का हलवता येईल.त्यासाठी शासनाने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
हवा गुणवत्तेविषयी चिंता
मागील दोन तीन महिन्यांपूर्वी कुलाबा आणि आसपासच्या परिसरातील हवा गुणवत्ता खालावली होती. सातत्याने या परिसरात वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झालेली आहे. पालिकेने जेव्हा कठोर उपाययोजना सुरु केल्या त्यानंतर येथील हवा गुणवत्तेत काहीशी सुधारणा झाली होती. यामुळे येथे प्रवासी धक्क्याच्या कामामुळे तसेच काम झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील हवा गुणवत्ता सुधारण्यापेक्षा ढासळतच जाईल अशी चिंता रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
याआधी सहा ठिकाणी बोटी उभ्य़ा करण्याची सुविधा या धक्क्यावर एकाच वेळी सहा ठिकाणी बोटी उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात येणार होती. त्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये निविदा मागवि्ण्यात आल्या. त्यानंतर मात्र या धक्क्यावर सहाएेवजी १० ठिकाणी २० बोटी उभ्या करम्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने धक्क्य़ावर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नव्या जेट्टीचे वैशिष्ट्ये
एका वेळी २० बोटी उभ्या राहणार
प्रवासी निवारा, वाहनतळ आदी सुविधांचाही समावेश
काम सुरु झाल्यापासून दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा याप्रकरणी विधानसभेतही हा मुद्दा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला होता. याप्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन नार्वेकर यांनी रहिवाशांना दिले आहे.