मुंबई : मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रकात रात्री सुटणाऱ्या शेवटच्या कसारा आणि कर्जत लोकलच्या वेळेत बदल केला असून नवीन वेळापत्रकात कसारा, कर्जत लोकल ६ ते १२ मिनिटे आधी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटची लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागणार आहे. परिणामी, प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

मध्य रेल्वेवरील लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार, लोकल सेवांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सीएसएमटी – कसारा लोकल दररोज रात्री १२.१४ वाजता सुटते. तर, सीएसएमटी – कर्जत लोकल दररोज रात्री १२.२४ वाजता सुटते. मात्र, ५ ऑक्टोबरपासून सीएसएमटी – कसारा लोकल रात्री १२.०८ वाजता, तर सीएसएमटी – कर्जत लोकल रात्री १२.१२ वाजता सोडण्यात येणार आहे. या लोकल अनुक्रमे ६ आणि १२ मिनिटे आधी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

हेही वाचा – मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव

प्रवासादरम्यान लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होतो. त्यामुळे वाढलेल्या गर्दीवर उपाययोजना करताना अधिक लोकल फेऱ्यांची मागणी करण्यात आली होती. तसेच सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी कसारा – ठाणे आणि कर्जत – ठाणे अशा लोकल फेऱ्या सुरू करणे आवश्यक होते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी – ठाण्यापर्यंत धावणाऱ्या लोकल कल्याणपर्यंत विस्तारीत केल्या. त्यामुळे ठाण्यातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तसेच सकाळी जलद लोकलमध्ये डोंबिवली येथील प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही. तर, मुंब्रा, कळवा येथे जलद लोकलला थांबा देऊन काय साध्य होणार आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवासी महासंघ / प्रवासी संघटना यांना विश्वासात न घेता वेळापत्रकामध्ये केलेले बदल प्रवाशांना त्रासदायक ठरणार आहेत, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ अध्यक्ष लता अरगडे यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका

रात्री शेवटच्या कसारा, कर्जत लोकलची सोडण्याची वेळ वाढवण्याऐवजी कमी केली आहे. नियमित वेळापत्रकाच्या ६ ते १२ मिनिटे आधी लोकल सुटेल. यामुळे कष्टकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कॅटरिंग, हॉटेल, सुरक्षा रक्षक, टॅक्सीचालक, रात्रपाळी करणाऱ्या हजारो कामगारांसाठी शेवटच्या दोन्ही लोकल महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा पूर्वीप्रमाणेच कराव्यात. – राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण – कसारा – कर्जत प्रवासी महासंघ