पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांना न्यायालयाकडून आणखी एक धक्का मिळाला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती.

संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांसाठी वाढ करण्यात आली आहे.

पत्रा चाळ गैरव्यवहारात संजय राऊतांचा सहभाग

पत्रा चाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.