मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष राज्यात लोकसभेच्या १० जागा लढवणार असून बुधवारी पार पडलेल्या संसदीय कार्यकारणी समितीमध्ये उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली. शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाच्या सर्व उमेदवारांची घोषणा करणार आहेत.

सुमारे चार तास चाललेल्या बैठकीत राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी तीन उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात आली. त्यापैकी काही नावे निश्चित करण्यात आली. माढामध्ये धैर्यशील मोहीत पाटील, शिरुरमध्ये अमोल कोल्हे, बारामतीत सुप्रिया सुळे, दक्षिण अहमदनगरमध्ये निलेश लंके, भिवंडीमध्ये बाळयामामा म्हात्रे यांची नावे जवळपास निश्चित आहेत.

हेही वाचा >>> लोकमानस : भरकटलेल्या युद्धांचा पोरखेळ ..

दिं डोरीमध्ये चिंतामणी गावित, भास्कर भगरे आणि हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नावावर चर्चा झाली. रावेरमध्ये शिरीष चौधरी, वर्ध्यात अमर काळे तर बीडमध्ये बजरंग सोनवणे आणि नरेंद्र काळे यांच्या नावावर चर्चा झाली. सातारामध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी लढण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यांचा मुलगा सारंग यास येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. वर्धा मतदारसंघातून अनिल देशमुख यांना लढण्याचा आग्रह झाला. मात्र त्यांनी नकार दिला. महायुती कोणते उमेदवार देते, त्यामुळे मतदारसंघातील जातीची गणिते काय होतील, हे पाहून राष्ट्रवादीचे काही उमेदवार बदलले जाऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीची यादी गुलदस्त्यात आहे. शिवसेना २२, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी १० असे जागावाटपाचे सूत्र निश्चित ठरल्याचे पवारांनी सांगितले.

Story img Loader