मुंबई : मध्य रेल्वेवरील परळ येथे १४५ वर्षे जुना परळ कारखाना असून तेथे हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरील परळ आणि पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी येथून हजारो कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू असते. कारखान्यातून बाहेर पडण्यासाठी, रेल्वे रूळालगत असलेल्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून कर्मचारी रेल्वे रूळ ओलांडताना. तसेच काही कर्मचाऱ्यांना परळ स्थानकात जाऊन पादचारी पुलावर जावे लागते. त्यानंतर त्यांना प्रभादेवी गाठता येते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या गर्दीत कर्मचाऱ्यांची रहदारी वाढते. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यासह सर्व प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी प्रभादेवी - परळदरम्यान ४० मीटर लांबीचा पादचारी पुलाची उभारण्यात येत आहे. भारतीय रेल्वेचा सर्वाधिक जुना आणि महत्त्वाचा परळ कारखाना आहे. या कारखान्यात सुमारे एक हजार कर्मचारी काम करतात. परळवरून प्रभादेवीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने हे कर्मचारी सर्रासपणे रेल्वे रूळ ओलांडतात. तसेच प्रभादेवी आणि परळ यांना जोडण्यासाठी पादचारी पूल आहे. मात्र या पुलावर प्रवाशांची कायम गर्दी असते. त्यामुळे पूर्व-पश्चिम दरम्यान प्रवास करता यावा यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने एप्रिल २०२३ पासून पादचारी पुलाच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. तसेच पादचारी पूल बांधण्यासाठी मध्य रेल्वेने १८ अनधिकृत बांधकामांपैकी ३ बांधकामे हटवली असून १३ बांधकामे हटविण्याचे काम हाती घेतले आहे. पश्चिम रेल्वेला पादचारी पूल उभा करण्यास सुमारे ३.६ कोटींचा खर्च अपेक्षित असून हे काम १५ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मध्य रेल्वेकडील भागाचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.