मुंबई : शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या चळवळीमुळे १९८० च्या दशकात मुंबईतील सुमारे ९० हजार मराठी माणसांना बँकांमध्ये नोकरी मिळाली. लोकाधिकार समितीच्या ३२५ शाखा हे शिवसेनेचे बलस्थान होते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी काढले. उत्तर -पश्चिम मुंबईचे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते. . शिंदे म्हणाले, सत्ता नसताना मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेच्या लोकाधिकार संघटनेने केलेले कार्य ऐतिहासिक असे आहे. शिवसेना मराठी माणसात वाढण्यासाठी या चळवळीचा उपयोग झाला. अतिशय शिस्तबद्ध अशी ही चळवळ होती. कार्यकर्त्यांला नेतृत्वाने ताकद दिली तर पक्ष मोठा होतो. शिवसेनेचे अलीकडचे नेतृत्व कार्यकर्त्यांचे पंख छाटत होते. बाळासाहेबांचे नेतृत्व असे नव्हते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. बाळासाहेब होते म्हणून नारायण राणे मुख्यमंत्री होऊ शकले. तेव्हा अनेकांच्या वेगळय़ा इच्छा होत्या. शेवटी नियतीच्या मनात असते ते कोणी बदलू शकत नाही, सांगत काल, आज आणि उद्याही आपण कार्यकर्ताच असू, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील हजारो जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असून मराठी माणूस मुंबईबाहेर गेला आहे. सरकारी संस्थांच्या मदतीने जुन्या इमारतींचा पुनर्विकास हाती घेण्यात येणार असून त्यामुळे मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस परत येईल, असा दावा शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे कधी कुणाच्या स्वागताला गेले नाहीत. पंतप्रधान ते राष्ट्रपती सगळी मंडळी ‘मातोश्री’वर येत असत. इंडिया बैठकीवेळी सोनिया गांधी यांच्या स्वागताला उद्धव यांचे कमरेपासून वाकणे वेदनादायी होते. इंडिया बैठकीचे ठाकरे यांनी केलेले आयोजन नसून हमाली होती, अशी टीका नारायण राणे यांनी केली.