मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन ही याचिका करण्यात आली आहे. माजी पत्रकार एस बालाकृष्णन यांनी उच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. उच्च न्यायालायने मात्र याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

पुलवामासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवून सीआयडी चौकशी करा अशी मागणी एस बालाकृष्ण यांनी याचिकेत केली आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भात इतकी गंभीर माहिती असतानाही रितसर तक्रार दाखल का करण्यात आली नाही ? असा सवाल एस बालाकृष्णन यांनी याचिकेतून केला आहे.

राज ठाकरेंनी देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. यानंतरच पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र सध्या उच्च न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.