लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील २०२२-२३ मधील पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातील ५७ केंद्रांवर मैदानी चाचणी घेण्यात आली. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या १८ हजार उमेदवारांना आता ७ जुलै रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे.

राज्यभरात १७ हजारांहून अधिक पदांसाठी भरती होत आहे. राज्यातील ६६ केंद्रांपैकी २२ केंद्रांमध्ये ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात मिरा भाईंदर, छत्रपती संभाजी नगर शहर, नवी मुंबई, सोलापूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, मुंबई लोहमार्ग, पालघर, सांगली, नाशिक ग्रामीण, अहमद नगर,धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, बीड, जालना, यवतमाळ, लातूर, वाशीम, भंडारा, वर्धा व पुणे लोहमार्ग या २२ पोलीस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारित ही परिक्षा होणार आहे. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे महाआयटीच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहेत.

आणखी वाचा-ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र : सरकारच्या निर्णयाने मराठा समाजात दुही

मुंबईतील भरती प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता

मुंबईतील भरती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. योग्य मैदान न मिळाल्यामुळे मुंबईतील मैदानी चाचणी अद्याप होऊ शकलेली नाही. ही भरती प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतील भरती प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तसे त्यांच्याकडून आम्हाला कळवण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) राजकुमार व्हटकर यांनी सांगितले.