मुंबईः वाळकेश्वर येथील जब्रेश्वर महादेव मंदिरातील आरतीवरून सुरू असलेल्या वादात आता राजकीय पक्षांनी उडी घेतली आहे. मंदिरात दर सोमवारी होणाऱ्या आरतीला स्थानिक हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणाला मराठी-अमराठी वादाचे स्वरूप देण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात आरती करणारे सर्व भाषिक असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. शिवसेना (ठाकरे) व मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महादेव मंदिरात आरतीचे आयोजन केले होते.
वाळकेश्वर बाणगंगा परिसराला लागूनच जबरेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराची १८४० मध्ये स्थापना करण्यात आली होती. या मंदिरात दर सोमवारी रात्री ९ ते ९.३० या वेळेत नगाडा व शंखाच्या नादात आरती केली जाते. पण या आरतीमुळे होणारा आवाज, आरतीसाठी भाविकांच्या येणाऱ्या दुचाकी याबाबत स्थानिक हाऊसिंग सोसायट्यांमधील काही रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून तक्रारी केल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत वाद सुरू होता. दीड महिन्यापूर्वीही झालेल्या तक्रारीनंतर स्थानिक सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना बोलावून वाद मिटवला होता. पण महापालिका निवडणूकीचे वारे वाहू लागल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून सोमवारी शिवसेनेचे (ठाकरे गट) स्थानिक पदाधिकारी, युवासेना यांच्याकडून ढोल, टाळासहित महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
दर सोमवारी होणाऱ्या आरतीला स्थानिक सोसायट्यांमधील रहिवासी तक्रारी करीत आहेत. तक्रारी करणाऱ्यांमध्ये अमराठी व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आम्ही येथे महाआरतीचे आयोजन केल्याचे शिवसेनेचे (ठाकरे) दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी सांगितले.
मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही सोमवारी या ठिकाणी रात्री कार्यकर्त्यांसोबत भेट दिली. स्थानिक गुजराती, मारवाडी भाषकांकडून आरतीबद्दल तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे हे प्रकरण सोडवण्यासाठी आपण तेथे भेट दिल्याचे देशपांडे यांनी सांगितले. जबरेश्वर मंदिरात आरतीच्या आयोजनात नियमित सहभागी असलेले कल्पेश कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा वाद दीड महिन्यापूर्वीच मिटल्याचे सांगितले. मराठीच नाही, तर अमराठी भाविकही मंदिरात आरती करतात. हा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद नाही, कारण सर्वात जास्त तक्रार एका मराठी महिलेने केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
एका वर्षांपूर्वी महाशिवरात्रीला याबाबत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून तक्रारी करण्यात आल्या होत्या. दीड महिन्यापूर्वी स्थानिक सहाय्यक पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूच्या मंडळींना बोलावले होते. तेव्हापासून हा वाद शांत झाला होता. पण आता अचानक राजकीय पक्षांनी त्यात उडी घेतल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.