मुंबई : मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर देखरेख करणाऱ्या जल अभियंता विभागातील अभियंत्यांची तब्बल ३८ टक्के पदे रिक्त आहेत. मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत राखणे, पाणी गळती, पाण्याचा अपुरा पुरवठा आदी तक्रारींचे निवारण करण्याच्या कामांवर त्यामुळे परिणार होऊ लागला आहे. या विभागात ११०० पदे असून त्यापैकी केवळ ७१२ पदे भरलेली आहेत.

मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची आहे. मुंबई महापालिकेतील अन्य विभागांप्रमाणेच जल अभियंता विभागातही अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. पाणीपुरवठ्याची यंत्रणा सुरळीत राखण्याबरोबरच या यंत्रणेत कुठेही गळती आढळल्यास ती दुरुस्त करणे, गढूळ पाण्याची समस्या वा अपुरा पाणीपुरवठा होत असल्यास त्या तक्रारींचे निवारण करणे ही कामे प्रामुख्याने या विभागातील अभियंत्यांना करावी लागतात. मात्र पदे रिक्त असल्यामुळे या तक्रारींच्या निवारणावर परिणाम होत आहे.

हेही वाचा >>>VIDEO : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजाच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षक जाळीवर मारल्या उड्या

गेल्या काही वर्षात मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. रस्त्यांची बांधणी, पूल उभारणी, मेट्रोची कामे, इमारतींचे बांधकाम अशी विविध कामे सुरू आहेत. या कामांदरम्यान अनेकदा जलवाहिन्यांना धक्का लागतो. त्यामुळे जलवाहिन्या फुटतात, किंवा कधीकाधी जीर्ण झाल्यामुळे जलवाहिन्या फुटतात. त्यामुळे पाणी गळती होते व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तसेच दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे याबाबतच्या तक्रारीं जल अभियंता विभागाला सोडवाव्या लागतात. जलवाहिन्या जमिनीखाली असल्यामुळे पाणी गळती शोधताना जल अभियंता विभागाचा कस लागतो. त्यामुळे पाणी गळती शोधण्यासाठी पालिकेने खाजगी संस्थांचीही नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>वन विभागाकडून मुंगूस, पोपट जप्त

या कामांबरोबरच विविध विकास कामांसाठी जल अभियंता विभागाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे, विकासकामांच्या आधी जलवाहिन्या हलवणे आदी कामे नियोजन विभागातील अभियंत्यांना करावी लागतात. मुंबईच्या हद्दीबाहेर धरणापासून मुंबईपर्यंत ज्या जलवाहिन्या आहेत त्यांची देखभाल, या जलवाहिन्या ज्या रस्त्यावरून जातात त्याची देखभालही या विभागामार्फत केली जाते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत मुंबईबाहेर दीडशे किमीच्या मोठ्या जलवाहिन्या आहेत, तर मुंबईच्या अंतर्गत सुमारे पाच हजार किमी लांबीचे जलवाहिन्यांचे जाळे आहे. पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने एखादा प्रकल्प पूर्ण केला की त्याची जबाबदारी जल अभियंता विभागाकडे सोपवली जाते. धरणापासून वितरण व्यवस्थेपर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या असलेल्या या विभागाकडे गेल्या काही वर्षात अभियंत्यांची पदे भरलेली नाहीत.