मुंबई : मुंबई- गोवा महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येत आहे. या कामाचे १० टप्पे असून त्यासाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमले आहेत. काही चुकीच्या कंत्राटदारांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. या महामार्गाचे काम पूर्ण होण्यास अजून किमान दोन वर्षे लागतील अशी कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी येथे दिली.

मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून सार्वनिक बांधकाम विभागावर सर्वच स्तरांतून टीका होत असताना चव्हाण यांनी मात्र या महामार्गाच्या दुरवस्थेस राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण जबाबदार असल्याचे सांगितले. या महामार्गावरील राजापूर ते गोवापर्यंतचा महामार्ग चांगला झाला असून संगमेश्वर ते राजापूर दरम्यानचे काम रखडले आहे. या महामार्गावर छोटे-मोठे १४ पूल आहेत. तसेच या रस्त्याला अनेक सेवा रस्ते आहेत. यामुळेच कामाला विलंब होत आहे.

हेही वाचा >>>अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाची दुसरी तुळई बसवण्याच्या कामाला सुरुवात

कंत्राटदार जबाबदार

या रस्त्याचे काम करणाऱ्या काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले. या ठिकाणी दुसरे कंत्राटदार नेमण्यात आले. मात्र त्यांनीही काम केले नाही. उपठेकेदार काम करत नसल्याने हा गोंधळ झाला आहे. तसेच या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्याच्या बांधकाम विभागाला नाहीत. केवळ देखरेख करण्याची जबाबदारी आहे. तरीही लवकर हे काम पूर्ण करून घेतले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.